नाशिक – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फायदा काही प्रमाणात नको त्यांना झाला आहे. काही प्रमाणात हे खरं आहे. मात्र या वेळी नियम काही वेगळे आहेत. त्यात एका घरात दोन महिलांना देता येत नाही, मोटार गाडी असेल तर त्यांना देता येणार नाही.
गरीबांना त्याचा लाभ झाला पाहिजे हा या योजनेचा उद्देश आहे. जे नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपले नावे काढले पाहिजे. जे पैसे दिले गेले आता ते परत मागण्यात काही अर्थ नाही, ते आता मागण्यात येवू नये.
मागे जे झाले ते लाडक्या बहिणींना अर्पण, मात्र याच्यापुढे लोकांना सांगावे, जे नियमित नाही त्यांनी स्वतःहून नावे काढून घ्यावे. अन्यथा सरकारने दंडासह वसुली करावी, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आणि आमदार छगन भुजबळ व्यक्त केली आहे.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानावर छगन भुजबळ म्हणाले, हा विषय संपला आहे. माझ्या विरुध्द कोणी काही बोलले नाही तर मी ही कोणाविषयी बोलणार नाही. सर्वांना शुभेच्छा, असे म्हणत त्यांनी अधिक बोलणे टाळले.
तसेच पक्षाने मला आदेश दिला आहे, वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु आहे. खाली आपण कोणतेही भाष्य करु नये. त्यामुळे मी त्या संदर्भात काही स्टेटमेंट करु इच्छित नाही असेही ते म्हणाले.
दरम्यान, माणिकराव कोकाटे म्हणाले होते की, गरज वाटली तर मी छगन भुजबळ यांची भेट घेईल. मला जर वाटलं त्यांचा सल्ला घ्यायचा आहे, तर मी भेट घेईल. पण भुजबळांचा सल्ला घ्यावा असं अजूनतरी मला वाटत नाही, असा टोला त्यांनी लगावला.