Bihar Election Results 2025 | बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएनं पुन्हा एकदा बाजी मारली आहे. एकूण २४३ जागा असणाऱ्या विधानसभेत सत्ताधारी आघाडीने थेट २०० चा पल्ला पार केला. बिहारमध्ये एनडीए आणि महाआघाडीत अतिशय चुरशीची लढत होण्याचे अंदाज वर्तवण्यात येत होते. मात्र, एनडीएच्या एकतर्फी विजयाने ते फोल ठरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची जोडी सत्ताधाऱ्यांसाठी हिट ठरली. एनडीएचा विजय होण्यामागचे अनेक रणनीतींचा परिणाम झाला आहे. चला तर मग एनडीएचा विजय होण्यामागची काही कारणे समजून घेऊयात… विरोधकांच्या आश्वासनाला प्रतिआश्वासन तेजस्वी यादवांनी जसे २०० युनिट मोफत वीजेचे आश्वासन दिले, तसे नीतीश कुमारांनी त्वरित १२५ युनिट मोफत वीजेची घोषणा केली. हा निर्णय त्या वेळी आला जेव्हा प्रीपेड मीटरबाबत लोकांमध्ये रोष वाढत होता. यामुळे अनेक कुटुंबांचे वीजबिल शून्यावर आल्याने लोकांची नाराजी दूर झाली. त्याचप्रमाणे तेजस्वींचे १००% डोमिसाइल आश्वासन NDA ने उलटवले. सरकारने ते फक्त महिलांसाठी लागू केले, ज्यांच्याकडे आधीच ३५% आरक्षण आहे. महिलांचा विश्वास जिथे होता तिथे आणखी मजबूत झाला. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनमध्ये ४०० वरून ११०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरला. यामुळे ज्येष्ठ मतदारांनी पुन्हा एकदा नितीशकुमार यांच्यावरच विश्वास दाखवला. Bihar Election Results 2025 | महिलांनी बजावली ‘किंगमेकर’ची भूमिका महिलांनी या निवडणुकीत सर्वात मोठ्या ‘किंगमेकर’ची भूमिका बजावली. नीतीश कुमारांच्या योजनांनी महिलांमध्ये विश्वास निर्माण केला. सायकल योजना, शिष्यवृत्ती, स्वयंसहाय्यता गट, सरकारी नोकऱ्यांमध्ये ३३%-५०% आरक्षण आणि यावेळी ‘महिला रोजगार योजना’ अंतर्गत १०,००० रुपये थेट हस्तांतरण, याचमुळे महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले आणि महाआघाडीचा संपूर्ण खेळ उलटवला. Bihar Election Results 2025 | ‘जंगलराज’चे नरेटीव्ह पुन्हा जिवंत NDA ने RJD विरोधात सर्वात मजबूत शस्त्र पुन्हा वापरले, ते म्हणजे जंगलराज. सोशल मीडियावर पसरलेले व्हिडिओ, व्यासपीठावर ‘कट्टा-संस्कृती’चे गाणे आणि जुन्या आठवणींची पुनरावृत्तीने NDA चे नरेटीव्ह आणखी मजबूत केले. मोदींनी ‘जंगलराज परत येऊ देऊ नका’, असा संदेश दिला. याचा परिणाम निवडणुकीत स्पष्ट दिसला. महिलांनी आणि मध्यमवर्गीयांनी NDA ला एकतर्फी पाठिंबा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली ‘कट्टा, दुन्नाली, रंगदारी’ची आठवण प्रभावी ठरली. Bihar Election Results 2025 | नितीश कुमार यांची सुशासन बाबू म्हणून ओळख नितीश कुमार यांची प्रतिमा बऱ्यापैकी स्वच्छ असून त्यांच्यावर वैयक्तिक भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत. तसेच बिहारच्या शासन आणि प्रशासनाला शिस्त लावल्याने सुशासन बाबू ही ओळख मिळालेली नितीश कुमार यांनी जपली आहे. प्रतिस्पर्धी तेजस्वी यादव यांच्या आक्रमक अंदाजाच्या तुलनेत नितीश कुमार यांचा हा चेहरा बिहारमधील मतदारांना भावला असल्याचे यंदाही दिसून आले आहे. नरेंद्र-नीतीश यांच्या जोडीचा कमाल पंतप्रधान मोदींच्या सभा, गावागावांपर्यंत पंचायत स्तरावरील निरीक्षण, बूथ व्यवस्थापन, सोशल मीडिया नरेटीव्ह, EBC आणि दलित घरांवर लक्ष याच्या पुढे महाआघाडी पूर्णपणे विखुरली गेली. यातच AIMIM ची एंट्री आणि प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या अपयशाने महाआघाडीचे वातावरण आणखी कमकुवत केले. योग्य वेळी उमेदवारांची घोषणा एनडीएने तिकीट वाटप प्रक्रिया वेळेत आणि संघटित पद्धतीने पूर्ण केली, ज्यामुळे कार्यकर्त्यांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळाला. जनतेतही सकारात्मक संदेश गेला. तिकीट वाटपात जातीय संतुलनाचे पूर्ण भान ठेवले गेले. एनडीएमध्ये चिरागचं पुनरागमन आणि वेळेचे व्यवस्थापन करण्यात आलं. चिराग पासवान यांना आघाडीत सामील करण्याची प्रक्रिया जरी लांबली, तरी एनडीएने ती निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच अंतिम केली. यावरून दिसते की एनडीए नेतृत्वाने आपली सर्वात मोठी आव्हानेही वेळेत ‘मॅनेज’ केली आणि प्रचार सुरू होण्यापूर्वीच आघाडीचं चित्र स्पष्ट केलं. महाआघाडीत जागावाटपाची रस्सीखेच आणि विलंब दुसरीकडे, महागठबंधनमध्ये जागा वाटपासाठी मोठी रस्सीखेच सुरु होती. तसंच उमेदवार जाहीर करण्यात विलंबही लागला होता. यामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल खचलं. तसच आघाडीत अंतर्गत मदभेद असल्याचंही समोर आलं. अनेक जागांवर नाराज उमेदवारांनी बंडखोरी केली. ज्याचा थेट फायदा एनडीएच्या उमेदवारांना झाला. Bihar Election Results 2025 | हेही वाचा: Navale Bridge : नवले पुलावरील अपघात रोखण्यासाठी ‘रिंगरोड’ला प्राधान्य : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती