West Bengal Politics : ममता बॅनर्जींना मोठा दिलासा; 20 खासदार बंडखोर असल्याचा दावा खोटा?
West Bengal Politics : टीएमसीच्या बंडखोर खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी दावा केला आहे कि, पक्षाच्या २० लोकसभा खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून एनडीएला (NDA) पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, या राजकीय संकटाच्या काळात ममता बॅनर्जी यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

West Bengal Politics : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय भूकंप आला असून तृणमूल काँग्रेसला (TMC) लागलेली गळती थांबताना दिसत नाहीये. पक्षाचे ५० हून अधिक आमदार फुटल्यानंतर आता खासदारांनीही माजी मुख्यमंत्री आणि टीएमसी पक्ष प्रमुख ममता बॅनर्जी यांची साथ सोडायला सुरुवात केली आहे.
टीएमसीच्या बंडखोर खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी दावा केला आहे कि, पक्षाच्या २० लोकसभा खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून एनडीएला (NDA) पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, या राजकीय संकटाच्या काळात ममता बॅनर्जी यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
बंडखोर खासदारांच्या यादीत नाव असलेल्या टीएमसी खासदार प्रतिमा मंडल यांनी गुरुवारी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी अशा कोणत्याही पत्रावर स्वाक्षरी केली नसल्याचे स्पष्ट केले असून बंडखोर गटाला थेट आव्हान दिले आहे. (West Bengal Politics)
‘माझी स्वाक्षरी असलेले पत्र दाखवाच’; प्रतिमा मंडल यांचे आव्हान – (West Bengal Politics)
जयनगर येथील टीएमसी खासदार प्रतिमा मंडल यांनी बंडखोर गटाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. एनडीएला पाठिंबा देणाऱ्या पत्रावर आपली स्वाक्षरी असल्याच्या बातम्या पूर्णपणे खोट्या आणि बनावट असल्याचा दावा त्यांनी केला. कोलकाता येथे माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या,
#WATCH | Kolkata, West Bengal | On her name reportedly included in the list of 20 rebel TMC MPs, party MP Pratima Mondal says, “This news is completely false… I am right here in Kolkata. I had an ‘Estimates Committee’ meeting scheduled for the 4th June at 11 AM. I caught the… pic.twitter.com/vpauWRUkpZ
— ANI (@ANI) June 11, 2026
“ही खोटी बातमी आहे. मला इथल्या जनतेने निवडून दिले आहे आणि त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. मी ४ तारखेनंतर दिल्लीला गेलेलीच नाही, मी कोलकातामध्येच आहे. जर तुमच्याकडे २० खासदार आहेत आणि ही बातमी गेली २-३ दिवस सातत्याने चालत आहे, तर मग तुम्ही खासदारांच्या स्वाक्षऱ्या असलेले ते पत्र मीडियासमोर का आणत नाही? ते पत्र दाखवून माझं नाव त्यात आहे की नाही, हे सिद्ध का करत नाही? माझ्या मतदारांना फसवू नका. मी जनतेच्या कौलाचा आदर करते आणि २०२९ पर्यंत ममतादीदींसोबतच राहणार आहे.”
ममता बॅनर्जींच्या कठीण काळात शत्रूघ्न सिन्हा सोबतच – (West Bengal Politics)
या संपूर्ण गदारोळात आसनसोलचे खासदार आणि ज्येष्ठ अभिनेते शत्रूघ्न सिन्हा यांनीही ममता बॅनर्जी यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. बंडखोरांच्या यादीत नाव येण्याच्या चर्चांवर बोलताना सिन्हा म्हणाले की, “माझ्या कठीण काळात ममता बॅनर्जी नेहमी माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या. त्यामुळे आता या संकटाच्या काळात ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसची साथ न सोडणे हे माझे कर्तव्य आहे.”
काय आहे पक्षांतर बंदी कायद्याचे गणित? (West Bengal Politics)
लोकसभेत टीएमसीचे एकूण २८ खासदार आहेत. पक्षांतर बंदी कायद्यानुसार, खासदारांचे पद रद्द होऊ नये (अपात्रतेपासून वाचण्यासाठी) म्हणून बंडखोर गटाला किमान दोन-तृतीयांश म्हणजेच १९ खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. बंडखोर गटाचे नेतृत्व करणाऱ्या काकोली घोष यांचा दावा आहे की त्यांच्याकडे २० खासदार आहेत, ज्यातील १८ खासदारांनी प्रत्यक्ष तर २ खासदारांनी ऑनलाईन स्वाक्षरी केली आहे. जर हा दावा खरा ठरला, तर बंडखोर गट टीएमसी पक्षावर आणि चिन्हावरही दावा ठोकू शकतो. मात्र आता सिन्हा आणि मंडल यांनी ममतांची साथ सोडणार नसल्याचे सांगितल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
राज्यसभेतही धक्के; एका आठवड्यात तिसरा राजीनामा –
एकीकडे लोकसभेत बंडाळी सुरू असताना, दुसरीकडे राज्यसभेतून टीएमसीचे खासदार एकापाठोपाठ एक राजीनामे देत आहेत. गुरुवारी टीएमसीचे राज्यसभा खासदार प्रकाश चिक बराईक यांनी आपल्या खासदारकीचा आणि पक्षाचा राजीनामा दिला. सुखेंदू शेखर रॉय आणि सुष्मिता देव यांच्यानंतर या आठवड्यात राजीनामा देणारे बराईक हे तिसरे खासदार ठरले आहेत.
राजीनामा दिल्यानंतर भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या निवासस्थानाबाहेर बराईक पत्रकारांशी बोलताना म्हणाले, “पश्चिम बंगालच्या जनतेने भाजपला कौल दिला आहे. तृणमूल काँग्रेसला जनतेचा पाठिंबा राहिलेला नाही. जनतेच्या या कौलाचा आदर करत मी पक्षाचा राजीनामा देत आहे.”
या आठवड्यातील मोठे राजीनामे –
सोमवार: राज्यसभा खासदार सुखेंदू शेखर रॉय यांचा पक्षांतर्गत मतभेदांमुळे राजीनामा.
बुधवार: राज्यसभा खासदार सुष्मिता देव यांचा राजीनामा. राजीनाम्यानंतर त्यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांची भेट घेतल्याने त्या भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहेत.
नवीन अपडेट्स: दरम्यान, जादवपूरच्या खासदार सायोनी घोष आणि दक्षिण कोलकाता येथील खासदार माला रॉय या देखील बंडखोर खासदारांच्या गटात सामील झाल्याचे वृत्त आहे.
या सर्व घडामोडींमुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात तृणमूल काँग्रेस अस्तित्वाची लढाई लढत असल्याचे चित्र दिसत आहे.





