लाखणगांव -विहीर खोदाईच्या कामात दरवाढ झाल्याने विहीर खोदाई करणे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टया परवडत नाही. सरकारने शेतकऱ्यांना विहीर खोदाईसाठी देत असलेल्या अनुदानात भरीव वाढ करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
दगडी खडकाचा स्फोट करून फोडावा लागतो. हा स्फोट करण्यासाठी लागणाऱ्या ताईत म्हणजेच जिलेटिनच्या बाजारभावात वाढ झाल्याने विहीर खोदाईच्या दरातही वाढ झाली आहे. सध्या विहीर खोदायची कामे सर्वत्र सुरू असून लॉकडाऊनमुळे विहिर खोदाईची कामे मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहेत. मात्र, जिलेटिन कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने दर दुप्पट वाढले आहेत, तसेच ताईत जिलेटिनचा पुरवठा करणाऱ्या व्यावसायिकांनी मुद्दाम तुटवडा केल्याचे काही ब्लास्टिंग करणारे सांगत आहेत.
खोदाईचे सध्याचे अनुदान अडीच लाखांचे
सरकारकडून विहीर खोदाईसाठी अडीच लाख रुपयांचे अनुदान दिले जाते; परंतु प्रत्यक्षात साडेतीन ते चार लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो. दोनशे ताईत असणारी पेटी आधी तीन हजार रुपयांना मिळायची. त्याच पेटीला आता सहा हजार रुपये द्यावे लागत आहेत, त्यामुळे सहा हजार रुपये प्रतिफुट असणारा विहीर खोदाईचा दर सात ते आठ हजार रुपयांपर्यत गेले असून, विहीर खोदाई तीस हजार रुपयांनी वाढली असल्याचे विहीर कंत्राटदाराने सांगितले.
मजुरांचा तुटवडा
विहीर खोदाईसाठी माणसांची उपलब्धता कमी असल्याने खोदायच्या कामावरही परिणाम झाला असून, विहीर खोदायची कामे कमी झाली आहे. सध्या माणसांच्या आणि पोकलेन मशिनच्या साह्याने खोदाई केली जाते. बहुतांश शेतकरी विहीर खोदाई ठेकेदाराला देतात. ज्या ठेकेदारांनी संचारबंदी आधी कामे घेतली त्यांना जिलेटिन ताईतचे दर वाढल्याने विहीर खोदाई करताना तोटा सहन करावा लागत आहे.