विजय शेंडगे
झाडांचं बोन्साय झालं तसंच साहित्याचंही बोन्साय होऊ पाहात आहे. कवितेत चारोळी आली. कथेत अलक म्हणजेच अति लघुकथा हा प्रकार रुजवण्याचा प्रयत्न झाला. चारोळीचं नवं कवींनी अगदीच खेळणं करून टाकलं. अलक कितीही प्रयत्न केला तरी मूळ धरणार नाही आणि “अडीच अक्षरं’ दोन कथांचा परिघ कवेत घेऊ शकणार नाहीत. अपर्णा कुलकर्णी यांच्या अडीच अक्षरं या कथासंग्रहातील दोन कथा या प्रकारातीलच आहेत.
दोन कथांचा समावेश असलेल्या या साहित्यकृतीचा अवकाश दोनशे पानांनी व्यापला आहे. त्यामुळे या दीर्घकथा अशा प्रकारात मोडणाऱ्या आहेत. त्यामुळे त्यांना कथा असं म्हणता येतं. माझ्या “अमृतस्पर्श’ या कथासंग्रहातील मनोगतात मी कथा, दीर्घ कथा यातील भेद स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. निव्वळ एखादा प्रसंग चघळणाऱ्या अथवा प्रसंगांचा धावता आढावा घेणाऱ्या आठ दहा पानी कथांपेक्षा, दीर्घकथा विषयाला अधिक न्याय देतात, असं माझं मत आहे आणि अडीच अक्षरं मधील “केतकीच्या बनी’ आणि “ही वाट दूर जाते’ या दोन्ही कथा वाचताना त्याचा प्रत्यय येतो.
प्रेम, विरह आणि प्रेम या चक्रात फिरणाऱ्या या कथा. आयुष्यातलं प्रेमाचं आणि माणसाने परस्परांना समजून घेण्याचं महत्त्व अधोरेखित करतात. सहवास, शृंगार यापेक्षा प्रेम हीच माणसाची मूलभूत गरज आहे, असं विचार या दोन्ही कथा मानवी मनावर ठसवू बघतात. लेखिकेचा तो प्रयत्न यशस्वी झाला आहे. कुठल्याही समीक्षकाने, परीक्षणकर्त्याने, प्रस्तावनाकाराने आपल्या लेखनात कथाविषयावर रसिकांच्या औत्सुक्याला बाधा येणार नाही अशा रीतीने भाष्य करावं. त्यांनी प्रामुख्याने कथेची मांडणी, त्या कथेच्या अनुषंगाने येणाऱ्या व्यक्तिरेखा, घटना, प्रसंग या विषयाचा उहापोह करावा.
कारण तोच कथेचा खरा आत्मा असतो. हा दोन्ही कथांचा विषय नेहमीचाच. आजवर अनेकांनी मांडलेला. प्रेमाच्या केंद्रबिंदू भोवती फिरणारा. विषयाचं वेगळपण नसूनही रसिकांना मंत्रमुग्ध करण्याची ताकद “अडीच अक्षरं’ या कथासंग्रहामध्ये आहे. लेखिकेची निवेदन शैली हे त्या कथांचं बलस्थान आहे. कुटुंब व्यवस्था मोडकळीस आलेली असताना, माणसा-माणसातली नाती ठिसूळ होत असताना, माणसाला नात्यांपेक्षा आपला स्वाभिमान, अहंभाव अधिक महत्त्वाचा वाटत असताना अशा विचारधारा रुजवू बघणाऱ्या कथा समाजव्यवस्थेची गरज आहे. राजीव बर्वे यांच्या दिलीपराज प्रकाशनाने प्रकाशित केलेला अपर्णा कुलकर्णी लिखित “अडीच अक्षरं’ हा कथासंग्रह ही सामाजिक गरज पूर्ण करताना दिसतो. त्यामुळेच हा कथासंग्रह अधिक वाचनीय झाला आहे.