– बंडा जोशी
अशा मोठ्ठ्या विमानात एकदा तरी बसू….उंच उंच फिरताना आपण ढगांसोबत हसू….
“अरे अरे ढगोबा’ या बालकविता संग्रहातल्या या दोन ओळी आहेत. बालमनाचे असे एक लोभस कल्पनाविश्व. अशा कल्पनांचे पंख असलेले एक मोठ्ठे विमान! अशा विमानात बसून, आकाशात उंच भरारी घेता आली. थोरवय विसरून, मी पोरवयाचा झालो. हरखून गेलो. याचे श्रेय सुजित कदम या तरुण व उमद्या कवीला जाते.
आजी गाई गाणे, झाड हळूहळू डुले
हिरवी हिरवी पाने म्हणजे
झाडोबाची मुले
अशा निरागस ओळी वाचल्या. मनात हिरवाई फुलली. वनराईची सफर घडली. आनंद झाला. लहान मुलांसाठी असे साहित्य लिहिणे, हे अतिशय अवघड असते. म्हणूनच, उत्तम बालसाहित्यकार मोजकेच असतात. या संग्रहामुळे, या यादीत सुजित कदम या कवीचे नाव महत्त्वाचे ठरावे. अवतीभवतीचा निसर्ग, माणसं, नातीगोती, प्राणी-पक्षी यांची प्रतिबिंबे बालमनात उमटत असतात. त्यांचा वेध सुजित यांनी या पुस्तकात अचूक आणि नेमका घेतला आहे.
जमिनीत बी पेरतात. या बी मधून रोप उगवते. त्या रोपाचे झाड होते. ते झाड माणसाला काय आणि कसे देत राहते, हे कळते. एकीचे बळ काय असते, याचा धडा मुंग्यांच्या कवितेतून मिळतो. पाण्यात वाहून चाललेल्या मुंगीसाठी झाड पान टाकतं. त्यावर तरंगत मुंगी वाचते, ही कविता परस्पर सहकार्य शिकवते. वाघ शहरात येतात. कारण आपण माणसं जंगलांमध्ये अतिक्रमण करतो. प्राण्यांना-पक्ष्यांना बेघर करतो, याची जाणीव जागृती होते.
सावली देताना झाड कधी
जातपात पाहत नाही
कितीही असलं ऊन तरी
सावली देणं सोडत नाही
यासारख्या ओळी कर्तव्यपालन, स्वभावधर्म व एकात्मतेचा मार्ग दाखवतात. सुट्टीतली मौजमजा, मुंगी, बेडूक, उंदीर-मांजर, वाघ, चिमणी अशा प्राणी-पक्ष्यांच्या गोष्टी यात आहेत. बिया, रोपे, झाडे, आभाळ ही निसर्गाची मनोहर रूपे आहेत.आजी-नातवंडातले गोड नाते आहे. स्वयंपाकाची भांडी आणि त्यांचे संमेलन, दिवाळीच्या फराळाची मज्जा याविषयी गमतीदार अशा कल्पना आहेत. विमान आणि ढगोबासमवेत आकाशातला विहार आहे. मोबाइलचा नाद सोडून, मैदानातल्या खेळांची गंमत अनुभवा, हे मुलांना सांगितले आहे.
नरवीर प्रकाशनाच्या विलास पायगुडे यांनी हे दर्जेदार पुस्तक प्रकाशित केले आहे. आशय-विषयाला अनुरूप अशी ही त्यांची उत्तम आणि देखणी निर्मिती आहे. चमकदार आणि गुळगुळीत आर्ट पेपरवर हे पुस्तक छापले आहे. छपाई सुबक, शब्द स्पष्ट व सुवाच्य आहेत.
चित्रकार संतोष घोंगडे यांनी मुखपृष्ठावर, ढगोबाबरोबर बाळोबाचे सुंदर चित्र काढले आहे. त्यांनी कवितेनुसार, आतल्या प्रत्येक पानांची रंगसंगती, चित्रे आणि मांडणी वेधक केली आहे. मुलांना ती आवडणारी आहे.
या संग्रहातील एका ओळीच्या चालीवर शेवटी सांगतो- हे पुस्तक मोठ्यांनी आवर्जून विकत घ्यायला हवे मुलांच्या हाती वाचायला आवर्जून द्यायला हवे
पृष्ठे – 28, किंमत – रु. 100/-