माझा “मी’ हे आत्मकथनपर पुस्तक डॉ. हणमंतराव तांदळे यांनी लिहिले आहे. आपल्या आयुष्यातील चढउतारांना त्यांनी शब्दरूपाने वाट करून दिली आहे. त्यांचे वडील त्यांच्या वयाच्या चौथ्या वर्षीच निवर्तले. त्यामुळे त्यांच्या घरावर दुःखाची कुऱ्हाड कोसळली. त्यांची आई निरक्षर होती. मोलमजुरी करून त्यांच्या आईने कुटुंब चालविले. त्यांच्या आई अनवाणी पायाने डोंगरावर जाऊन लाकूडफाटा गोळा करीत असे. “अनवाणी’ या शब्दामुळे वाचकांच्या मनात “काटा’ रुततो.
अतिशय साध्या शब्दांत लेखकाने आपले आत्मकथन केले असून पुस्तक वाचकांना खिळवून ठेवते. त्यांनी शिक्षणासाठी केलेली धडपडही नवतरुणांसाठी ऊर्जा देणारी आहे.
मॅट्रिकमध्ये असताना पुसेगाववरून रोज डबा नेणे-आणणे यासाठी सातारा एसटी स्टॅन्डवरून दीड-दोन तास त्यांना लागत होते. मात्र परमेश्वर कोणत्या ना कोणत्या रूपात भेटतच असतो या त्यांच्या श्रद्धेची त्यांना वेळोवेळी प्रचिती आली. ते 1960 साली परिंचे येथे सरकारी डॉक्टर म्हणून रुजू झाल्यावर त्यांची “एका लग्नाची गोष्ट’ सुरू झाली. मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नांमुळे आणि मुलीने दिलेल्या उत्तरांमुळे विनोद साधला गेला आहे.
या पुस्तकाच्या शेवटी त्यांच्या हितचिंतकांचेही त्यांच्याविषयीचे मत मांडण्यात आलेले आहे. त्यावरून डॉ. तांदळे यांचा मोठेपणा जाणवतो. रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा, असे त्यांच्या प्रत्येक व्यवहारात दिसून येते. भिगवण व परिसरामध्ये लोकमान्य डॉक्टर असा त्यांचा नावलौकिक होता. गोरगरिबांशी त्यांचे जिव्हाळाचे संबंध होते. पैसे असो वा नसोत इथे उपचार होणारच अशी सर्व सामान्यांना खात्री वाटत असे.
रुग्णांशी जुळलेली त्यांची नाळ शेवटपर्यंत कायम राहिली. पुरुष नसबंदीच्या एका दिवसात 210 शस्त्रक्रिया त्यांनी केल्या. रुग्णांसाठी केलेले कार्य या पुस्तकातील पानापानांत दिसून येते. लेखकाच्या ओघवत्या भाषाशैलीमुळे पुस्तक कंटाळवाणे होत नाही. पुस्तक आकर्षकरुपात आहे. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींना न घाबरता त्यावर मात करण्यासाठी तरुणांनी प्रेरणा घ्यावी असे हे पुस्तक आहे.