– विजय शेंडगे
बरेच लेखक पुरस्काराचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून लेखन करतात. जाणीवपूर्वक सामाजिक, स्त्री शोषण, गावकुसाबाहेरील जीवन असे विषय निवडले जातात. त्यातून लेखन आक्रोशी, आक्रस्ताळी होताना दिसतं. या सगळ्यामुळे लेखनाचा स्तर घसरला आहे.
रसिक, वाचन परंपरेपासून दुरावला आहे. लेखनाला सामाजिक, शोषित, वास्तववादी असं लेबल लावून शब्दांचं पीठ पाडण्याचं काम सुरू आहे. अशा पार्श्वभूमीवर प्रा. डॉ. महेश खरात यांची “बुर्गांट’ ही कादंबरी रसिक वाचकांचे लक्ष वेधते.
या कादंबरीत अनेक पात्रं आहेत. परंतु त्यांची स्वभावचित्र रेखाटताना लेखकाने कोठेही आततायीपणा केलेला नाही. बटबटीतपणा येऊ दिला नाही. निषिद्ध मानावेत असे शब्द वापरले नाहीत.
नेहमीच्या समाजमान्य भाषेचा आधार घेत लेखकाने या व्यक्तिरेखांमधील वेगळेपण अधोरेखित केलं आहे. मनोविश्लेषणात्मक पातळीवर प्रत्येक व्यक्तिरेखेतील वेगळेपण रेखाटण्यात लेखकाला कमालीचे यश लाभले आहे.
ग्रामीण कॅनव्हासवर अवतरणारी ही कादंबरी तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा, ग्रामीण भागातील भाषेचा, तिथल्या चालीरितींचा, ग्रामीण भागातील संस्कृतीचा लेहेजा अचूक सांभाळते. बुर्गांट, मोरणी, ईरड, इस्कटणे, मातरं, उजवणे, गमने, बक्कळ, किरपाना असे अस्सल ग्रामीण बाजाचे, भाषिक परंपरेतून लुप्त होत चाललेले कितीतरी शब्द या कादंबरीत भेटतात. भाषेच्या सौंदर्यात भर टाकतात.
ही कादंबरी नातेसंबंधातली सफलता आणि विफलता, जगण्यातली अर्थहीनता आणि अर्थपूर्णता दाखवून देते. मानवी नातेसंबंधावर प्रकाश टाकते. त्या नात्यातील ठिसूळता दाखवून देते. त्यातील कणखरपणासुद्धा दाखवते. नात्यातील स्वार्थीपणावर प्रकाश टाकतेच; परंतु त्यातील त्यागावर देखील नेमकेपणाने बोट ठेवते.
बुर्गांट म्हणजे अवेळी येणारा हलकासा पाऊस. हा पाऊस फायद्याचा ठरण्याची शक्यता कमीच असते. उलट तुम्ही काळजी घेतली नाही, त्याला समर्थपणे तोंड दिलं नाही तर अवेळी आलेला हा पाऊस नेहमीच होत्याच नव्हतं करू शकतो. उभ्या पिकाचं मातरं करू शकतो. हे “बुर्गांट’ कादंबरीतल्या मालनचा आयुष्यभर पाठपुरावा करतं.
मालन मात्र नेहमीच त्याला हुलकावण्या देते. नैसर्गिक आणि मानवी अशी दोन्ही स्वरूपाची बुर्गांटं मालनच आयुष्य नासवण्याचा प्रयत्न करतात. परंतु मालन त्याला समर्थपणे तोंड देत आयुष्याला सुखाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करते.
कादंबरीच्या शेवटाला मृत्यूचं जे रूप लेखकाने दाखवून दिलं आहे ते अकल्पित म्हणावं असं आहे. परंतु मृत्यू कोणीही पाहिलेला नसल्यामुळे ते रूप अवास्तव आहे, असं म्हणता येणार नाही.
तीन एक पानांचा तो परिच्छेद लेखकाच्या आगळ्यावेगळा विचार करण्याच्या क्षमतेची साक्ष देतो. एकूणच मराठी साहित्यदालनात प्रा. डॉ. महेश खरात यांची बुर्गांट ही कादंबरी मोलाची भर घालेल, असा विश्वास वाटतो.