प्रा. बालाजी चिरडे
डॉ. विश्वाधार देशमुख यांचे तिसरे पुस्तक “दिंडी’ नुकतेच प्रकाशित झाले आहे. डॉ. देशमुखांच्या लेखनाचे वैशिष्ट्य असे की, ते लेखनाचा कोणताही तुकडा किंवा भाग गंभीरपणे व अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडतात. विषय अध्यात्माचा असो की साहित्याचा, लोकप्रबोधनाचा असो की करुणेच्या आर्त स्वरांचा… त्यांची लेखणी ते सोनाराच्या हाताने वापरतात. एक एक दागिना घडवताना सोनार जसा आपल्या सोन्याच्या किंवा रूप्याच्या अधिकाधिक वापराचा व लकाकीचा विचार करतो तसे त्यांचे लेखन आहे.
या लेख संग्रहात 23 लेखांचा समावेश केलेला असून कोणताही लेख कधीही वाचावा आणि आपल्याला पुन्हा उर्जित करावे असे आहेत. जीवनाच्या सगळ्या क्षेत्रांना स्पर्शून जाणारे हे लेख असून भारतीय प्रबोधनाची, करुणेची, प्रेमाची, आपुलकीची, सहजीवनाची आणि
स्वतःला जास्तीत जास्त मोक्षोन्मुक्त करणारी जी संस्कारधारा आहे तिची प्रत्येक पिढीला ओळख करून देण्याची नितांत आवश्यकता असते. जसजसे आपण पुढे जात आहोत तसतसा तरुणांचा “स्क्रीनटाइम’ वाढत आहे व पुस्तके वाचण्याची क्षमता कमी होत आहे. म्हणजे त्यांचा “मिनटाइम’ उणे होत चालला आहे. अशा काळात कमी शब्दांत, कमी जागेत आशयघन लिखाण करणे हे खरोखर शब्दप्रभूंनाच शक्य आहे, जे या पुस्तकात साध्य झाले आहे.
डॉ. देशमुख म्हणतात, त्याप्रमाणे “दिंडी’ ही खरेतर वारकरी संप्रदायातील लोकांच्या जीवनातील अविभाज्य भाग बनलेली आहे; म्हणजे ती आपल्या डीएनएमध्ये शिरलेली आहे. आषाढी-एकादशी आणि कार्तिकी यात्रा करणाऱ्या केवळ वारकरी जनांसाठीच नव्हे तर पंढरपुरातील विठूराय हा भारतातील असंख्य लोकांचे आराध्यदैवत झालेले आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू तर उत्तरेला मध्य प्रदेशापर्यंत भक्तांचा विस्तार झालेला आहे. या भक्तिरसाचा वापर करीत डॉ. देशमुख संपूर्ण भारताच्या इतिहासातील प्रबोधनाचा धागा आपल्यापर्यंत म्हणजे आजच्या नवतरुणांपर्यंत प्रवाही आणि प्रभावीपणे पोचविण्याचे कार्य या पुस्तकाद्वारे करतात.
त्यांच्या लेखांची नावे जरी आपण वाचली तर त्याचा समकालीन रेलेव्हंस आपल्या लक्षात येतो. “सोडी सोन्याचा पिंजरा’ असेल किंवा “थोडा उजेड ठेवा’ किंवा “व्यर्थ गेला तुका; व्यर्थ ज्ञानेश्वर’ हा लेख असेल. अशी लक्षवेधी नावे जरी वाचली तरी आपल्या लक्षात येते की, त्यांच्या संदर्भाचा पट खूप मोठा आहे. “सोडी सोन्याचा पिंजरा!’ हा लेख अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे.आपल्या सुखसोयींचा त्याग करून आपल्या “कम्फर्ट झोन’मधून बाहेर पडूनच अनेकांना आपल्या मुक्तीचा, विकासाचा मार्ग गवसलेला आहे. आपल्याच चौकटी ज्यांना तोडता येत नाहीत त्यांना नवविचारांचे, नवनिर्मितीचे सुख आणि हर्ष मिळणे शक्य नसते. आपापल्या मूल्यांसह जगण्यासाठी आपल्या चौकटी फेकून देऊन, त्याची किंमत मोजून आपल्या अटींवर जे जगले त्यांना आपले ध्येयस्थान सापडले.
आम्हा सामान्य पामरांना आमच्या विकारांपासून मुक्ती मिळत नाही. राग, लोभ, मोह, माया, मत्सर अशा षडरिपुंपासून दूर जाता येत नाही. संसाराची गोडी सुटत नाही, पैलतीर दिसत नाही. त्यामुळेच जीवनाचे जहाज हेलकावे खात खात कसेबसे पैलतीरावर जाते; पण तेथे गेल्यावर लक्षात येते की आपले जीवन फुकट गेले. असे जीवन व्यर्थ गेले आहे असे वाटू नये किंबहुना ते जाऊ नये यासाठी “दिंडी’शी समरसून जाणे आणि ते दरवर्षी “दिंडी’मय होणे यातून आपले श्रमसाफल्य आहे,
असे लेखकाला वाटते. बुद्धी आणि हृदय, विचार आणि भावना यांना एकाचवेळी आवाहन करणारे हे “मस्ट रिड’ कॅटेगरीतले पुस्तक आहे. आपल्या कपाटात ठेवावे नव्हे सतत सोबत बाळगावे अशा पुस्तकांपैकी हे एक आहे. बाकी मागील दोन वर्षांपासून “करोना’कहरामुळे आपल्यापैकी अनेकांची वारी चुकली आहे. पण ही “शब्दरूपी दिंडी’ प्रत्येकाने आवर्जून अनुभवावी अशीच आहे.