Wedding Delays Due To Traffic – पूर्व हवेली परिसरात सध्या लग्नसराई जोरात सुरू असताना लग्नघटीकेला वाहतूक कोंडीचा ‘खो’ मिळत असल्याने अनेक विवाह सोहळे दोन ते तीन तास उशिरा लागण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. लग्न हा दोन कुटुंबांचा मिलापाचा सोहळा असला तरी प्रत्यक्षात मुहूर्त आणि लग्न लागण्याची वेळ यांचा मेळ बसत नसल्याचे चित्र दिसत आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील सततची वाहतूक कोंडी, अव्यवस्थित पार्किंग आणि मंगळकार्यालयांबाहेरील गर्दी यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी वाहनचालक दिसेल त्या ठिकाणी गाड्या उभ्या करत असल्याने कोंडीत भर पडत आहे. शेवाळेवाडी परिसरातील एका मंगळकार्यालयात सायंकाळी 6.45 वाजताचा मुहूर्त असतानाही कोंडीमुळे पाहुणे वेळेवर पोहोचू शकले नाहीत, परिणामी लग्न उशिरा लागले. याशिवाय नवरदेवाच्या मिरवणुकीतील नाच-गाणे, कार्यक्रमातील सत्कार, भाषणबाजी आणि मान्यवरांच्या आगमनाची प्रतीक्षा यामुळेही मोठा वेळ खर्ची पडत आहे. काही ठिकाणी नवरदेव मंडपात पोहोचायलाच उशीर होत असल्याने संपूर्ण कार्यक्रमाची वेळ ढासळते. दरम्यान, सध्या आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांना एका दिवसात अनेक लग्नांना उपस्थित राहावे लागत आहे. त्यामुळे ते केवळ काही मिनिटांची उपस्थिती लावून पुढील ठिकाणी निघतात; मात्र वाहतूक कोंडीमुळे त्यांनाही मोठा अडथळा निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी लग्नाची वेळ सायंकाळी असली तरी प्रत्यक्ष सोहळा रात्री उशिरा पार पडत असल्याची उदाहरणे वाढत आहेत. यामुळे पाहुण्यांना ताटकळत बसावे लागत असून वेळेचे नियोजन पूर्णपणे ढासळल्याचे दिसून येत आहे. भाषणबाजी मर्यादित हवी लग्नाचा मुहूर्त रात्री उशिराचा ठेवण्याऐवजी ठरलेल्या वेळेचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. मान-सन्मान कार्यक्रम वधू-वर येण्यापूर्वीच पार पाडावेत आणि भाषणबाजी मर्यादित ठेवावी. तसेच उशीर होत असल्यास पाहुण्यांनीही निघून जाण्याची भूमिका घ्यावी, असे मत सामाजिक कार्यकर्ते आण्णा चौधरी व सुभाष कड यांनी व्यक्त केले.