मार्च महिना ठरणार अधिक ‘ताप’दायक ! उष्णतेच्या लाटेचे दिवस सामान्यपेक्षा जास्तच ; हवामान विभागाचा इशारा

Weather Update । राज्यात फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झाली होती. त्यात आता आजपासून सुरु होणाऱ्या मार्च महिन्यासाठी हवामान विभागाने कडक इशारा दिला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेचे दिवस सामान्यपेक्षा अधिक राहण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दरम्यान, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी राज्यात प्रचंड तापमान नोंदवले गेले.
कोकण गोवा भागात सामान्य तापमानाच्या तुलनेत साधारण 3-5 अंश सेल्सियस अधिक तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही प्रचंड रखरख जाणवू लागलीय. शुक्रवारी राज्यात मुंबईत 38.4 अंश सेल्सियस तापामानाची सर्वााधिक नोंद झाली. अकोल्याचा पाराही 38 अंश होता. विदर्भात बहुातश ठिकाणी 36-38 अंशांपर्यंत तापमानाची नोंद होतेय.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सध्या पश्चिम राजस्थानला जोडून पाकिस्तानाच्या काही भागांमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागांमध्येही त्याचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. राज्यात आता उष्णतेच्या लाटांचा नसला तरी येत्या दोन दिवसांनंतर कोकणातील काही जिल्ह्यांना प्रचंड उष्ण आणि दमट वातावरण जाणवणार आहे. मंगळवारपासून दक्षिण कोकण, गोवा तसेच मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
येत्या 5 दिवसांचा आणखी तापमान वाढणार Weather Update ।
महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात येत्या पाच दिवसात तापमानात 1-2 अंशांनी वाढ होणार आहे. कमाल तापमानाचा पारा 35-37 अंश सेल्सियसदरम्यान असेल. कोकण भागात येत्या 24 तासांत 1-2 अंशांची घट होणार असून उर्वरित महाराष्ट्राही सुरुवातीला 1-2 अंशाची हळूहळू घट होऊन नंतर मात्र 2-3 अंशांनी वाढ होणार आहे.
मार्चमध्ये कसे राहणार तापमान? Weather Update ।
हवामान अभ्यासक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्चच्या सुरुवातीच्या दिवसात राज्यातील अंतर्गत भागात 2-3 अंशांनी तापमान वाढणार आहे. राज्यभरात तापमानाचा पारा प्रचंड वाढणार असून कोकण गोव्याच्या तापमानात फारसा बदल होणार नसल्याचे ही त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, मार्चच्या पहिल्या आठवड्यात मध्य प्रदेशात ढगाळ आकाश आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम-उत्तर भारतात 2 मार्चपासून वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होत आहे. त्याचा परिणाम राज्यातही दिसून येत आहे. विशेषत: 4 मार्चपासून इंदूर, ग्वाल्हेर आणि चंबळ भागात काही ठिकाणी हवामान बदलू शकते. याआधी दिवसा आणि रात्रीच्या तापमानात 2 ते 4 अंशांची वाढ होणार आहे.





