मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील तुरळक भागांत पावसाचा जोर वाढत आहे.15 ऑगस्टला राज्याच्या काही भागांत चांगला पाऊस पडला असून, 16 ऑगस्टला देखील राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने विविध प्रकारचे अलर्ट जारी केले आहेत. पुढील 24 तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोकणात तीव्र पावसाचा अंदाज कोकण विभागातील मुंबई, ठाणे आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे, यासाठी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही तीव्र पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे. विशेषतः रायगड जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. पश्चिम महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पाऊस पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, पुणे, कोल्हापूर आणि सातारा येथील घाटमाथा परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने या ठिकाणांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. या पाच जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. उत्तर महाराष्ट्रात यलो अलर्ट उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांत वादळी वारे आणि विजांसह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिकच्या घाटमाथा परिसरातही मुसळधार पावसाचा अंदाज असून, यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. विदर्भात मिश्र हवामान विदर्भातील नागपूर, अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यांत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे, तर चंद्रपूर आणि यवतमाळ येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. या आठ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र, अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांत पावसाची शक्यता नसून, तिथे स्वच्छ सूर्यप्रकाश दिसेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. नागरिक आणि शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन 16 ऑगस्टला राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील काही दिवस पाऊस कायम राहणार असल्याने शेतकऱ्यांनी हवामान अंदाजानुसार शेतीची कामे नियोजित करावीत, अशी सूचना हवामान विभागाने केली आहे.