पुणे : पिटू भक्तीचा डांगोरा । कळिकाळासी दरारा । तुका म्हणे करा । जयजयकार आनंदे ।। असं तुकाराम महाराजांनी म्हटलंय. याच वाटेवरून पंढरीच्या दिशेने लक्षावधी पावले विठू माऊलीचा जयघोष करत आनंदाने नाचत भजने म्हणत जात असतात. पण यंदाच्या करोनाच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या या अनवट भक्तीला मुरड घालावी लागण्याची चिन्हे आहेत. याबाबत पालखी सोहळ्याच्या वतीने सर्व संबंधितांशी विचार विनिमय करून शासनाला प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर शासनाच्या सूचनेनुसार वारकऱ्यांची आणि समाजाची सुरक्षितता लक्षात घेऊन वारीचे स्वरूप निश्चित करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
देहू आणि आळंदी पालखी सोहळयाचे नियोजन, स्वरूप यासंदर्भात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत बैठक झाली. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधुकर महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ऍड. विकास ढगे पाटील, योगेश देसाई, अभय टिळक, विशाल मोरे, संतोष मोरे, माणिक मोरे, संजय मोरे आदी उपस्थित होते.
वारकरी संप्रदायाची परंपरा असणाऱ्या ऐतिहासिक अशा श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारीला राज्याच्या भावजीवनात विशेष महत्त्व आहे. आळंदी – पंढरपूर पालखी प्रस्थान स्वरूपाबाबत आळंदी आणि देहू या दोन्ही संस्थान प्रमुखांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला. करोनाचा प्रादुर्भाव पाहता वारी आणि पालखी सोहळ्याच्या स्वरूपाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे राम यांनी सांगितले.