नागपूर – राज्य सरकार विदर्भातील संत्रा, मोसंबी आणि इतर फळ उत्पादकांची शाश्वत वाढ आणि उपजीविका सुधारण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणार असल्याची माहीती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. फळशेती आणि रोपवाटिकांच्या नियमनाशी संबंधित सुधारणांवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत महाराष्ट्र फळ रोपवाटिका (नियमन) अधिनियम, १९६९ मध्ये प्रस्तावित सुधारणांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. ज्याचा उद्देश लागवडीच्या साहित्याची गुणवत्ता सुधारणे आणि विदर्भातील लिंबूवर्गीय फळांचे उत्पादन जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवणे हा आहे. भरणे म्हणाले, रोपवाटिकांची राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाकडे नोंदणी आणि सर्व लिंबूवर्गीय फळांच्या रोपवाटिकांसाठी अनिवार्य अधिस्वीकृती लागू केली जाईल. या निर्णयामुळे फळांची गुणवत्ता, निर्यातीची क्षमता आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्पर्धात्मकता लक्षणीयरीत्या सुधारेल. यावेळी गडकरी यांनी कृषी विद्यापीठांना २० मॉडेल रोपवाटिका, एआय-आधारित विरळणी यंत्रसामग्री, लिंबूवर्गीय फळांचे मॉडेल फार्म आणि इतर आवश्यक संशोधन उपक्रम स्थापन करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.