लोणी काळभोर : कचरा प्रश्नावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर एमआयटी शिक्षण संस्थेला कायदेशीर भाषेत उत्तर देऊ, असा खणखणीत इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांनी दिला. दरम्यान, या विषयावर आयोजित करण्यात आलेली ग्रामसभा गणपूर्ती अभावी तहकूब करण्यात आली. लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींच्या हद्दीतील कचरा गेली 25-30 वर्षे मुळा-मुठा नदीकिनारी असलेल्या शासकीय जागेत टाकला जातो. 26 फेब्रुवारी रोजी या कचर्याला भीषण आग लागल्यानंतर हा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. त्यानंतर एमआयटीतील विद्यार्थ्यांनी कचरा टाकण्यास विरोध करत आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर ग्रामपंचायतीत चर्चा करण्यासाठी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. मात्र कमी उपस्थितीमुळे सभा तहकूब करण्यात आली. हेही वाचा : मोठी बातमी..! धर्म स्वातंत्र्य विधेयक विधानपरिषदेतही मंजूर; अनिल परबांचा सरकारला सवाल यावेळी बोलताना प्रशांत काळभोर म्हणाले, एमआयटी संस्थेने विद्यार्थ्यांचा वापर करून आंदोलन घडवून आणले. गावकर्यांनी विरोध केला असता तर विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले असते, म्हणून आम्ही संयम बाळगला. मात्र आमच्या संयमाला कमजोरी समजू नये. तसेच त्यांनी आरोप केला की, एमआयटीकडे स्वतःचा कचरा प्रक्रिया प्रकल्प नाही आणि त्यांचा कचरा नदीपात्रात टाकला जातो. गट क्रमांक 39 मधील रस्ता गायब करण्यात आल्याचा व ओढ्यावर अतिक्रमण झाल्याचाही आरोप त्यांनी केला.शिवसेना नेते रमेश भोसले यांनीही एमआयटीची भूमिका आडमुठी असल्याचे मत व्यक्त केले. ग्रामसभेला प्रशासक सरपंच नागेश काळभोर, माजी सरपंच राजाराम काळभोर, ग्रामविकास अधिकारी एस. एन. गवारी, राहुल काळभोर, राजेंद्र काळभोर, प्रताप बोरकर, बाळासाहेब काळभोर, कृष्णा पवार, पांडुरंग केसकर, विठ्ठल काळभोर, हेमंत गायकवाड, युवराज काळभोर, विनायक कांबळे आदी उपस्थित होते. कचरा प्रश्नावर अद्याप ठोस तोडगा न निघाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी असून, पुढील ग्रामसभेत यावर निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गाव आधी अस्तित्वात आहे, एमआयटी नंतर आली आहे. गावच्या मालकीच्या रस्त्यावर नागरिकांना अडवले जात असल्यास कठोर कारवाई केली जाईल. -सूर्यकांत गवळी, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण कक्ष हेही वाचा : Baramati News : यंदाची गुढी, मातृत्वाच्या स्वप्नपूर्तीची! ‘श्री चैतन्य’ने फुलविली १०१ सुखी संसार