हिरडस मावळ : वीसगाव खोऱ्यातील विकास कामांसाठी आतापर्यंत अनेक कोटींचा निधी दिलेला आहे. या निधीच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधला आहे. वीसगाव खोरे (ता.भोर) परिसरातील जनता विकासभिमुख भाजपाच्या विचारांची असून देशात तसेच राज्यात भाजप सरकार असल्याने पुढील काळात उर्वरित विकास कामांसाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देऊ, असे प्रतिपादन माजी आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केले. वीसगाव खोऱ्यातील वरोडी खुर्द येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा ५ कोटी ४४ लाख रुपयांच्या योजनेचे उदघाट्न करताना भोर – वेल्हा – मुळशीचे माजी आमदार संग्राम थोपटे बोलत होते. यावेळी राजगड ज्ञानपीठ मानद सचिव स्वरूपा थोपटे,राजगड संचालक उत्तम थोपटे, खरेदी – विक्री संघ चेअरमन अतुल किंद्रे, भाजप जिल्हा युवामोर्चा सरचिटणीस अमर बुदगुडे, सरपंच शीतल संदीप भिलारे,उपसरपंच रोहिदास वरे,सदस्य सागर वरे, जयवंत वरे, राजाराम तुपे, विजय तुपे, अशोक तुपे, आनंदा वरे, बाळू पोळ, अशोक भिलारे आदींसह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी आमदार थोपटे पुढे म्हणाले, पुढील काळात वीसगाव खोऱ्यातील जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे काम केले जाईल. तर वरोडी पाले परिसरातील दुरावस्था झालेल्या रस्त्यांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.सर्वसामान्य,गोरगरिबांचा सर्वांगीण विकास हाच ध्यास मनी धरून भाजपा सरकारच्या माध्यमातून भरघोस निधी मिळवून वीसगाव खोऱ्याचा विकास साधला जाणार आहे.त्याप्रमाणे तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.