इस्लामाबाद – काश्मीरप्रकरणी सर्वबाजूंनी मार खाल्यानंतरही अजूनही पाकिस्तानची मुजोरी काही कमी झालेली नाही. जगभरात चौफेर मार पडत असताना इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळात काश्मीर व गिलगिट-बाल्टिस्तानचे मंत्री असलेले अली अमीन यांनी, भारताला सहकार्य करणाऱ्या देशावर क्षेपणास्त्र सोडू, अशी दर्पोक्ती केली आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्राला संबोधित करताना भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध होण्याची शक्यता वर्तवून जगाला घाबरविण्याचा प्रयत्न केला होता. आता त्यांच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या अली अमीन यांनी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना भारताला सहकार्य करणाऱ्या देशांना धमकीच दिली आहे. जर भारत काश्मीर मुद्यावरून मागे फिरला नाही तर त्याचा त्याला जबर दंड सोसावा लागेल.
भारतच नव्हे तर, जे काश्मीर प्रकरणी भारताच्या पाठीशी उभे राहतील, भारताला मदत करतील त्यांनाही परिणाम भोगावे लागतील. एक क्षेत्रणास्त्र भारताच्या दिशेने सोडले जाईल, त्याचवेळी दुसरे क्षेपणास्त्र त्या देशावर सोडले जाईल. आज सारे जग काश्मीर प्रकरणी मौन बाळगून बसले आहे, ते योग्य नाही. ही धोकादायक स्थिती आहे आणि त्याचे परिणाम साऱ्यांना भोगावे लागेल, अशी धमकी पाकिस्तानच्या या मंत्र्याने दिली.
दरम्यान, एका पत्रकाराने अली अमीन यांना प्रश्न विचारला की, जर एखादा मुस्लिम देश जर भारताला सहकार्य करीत असेल तर पाकिस्तान काय करेल? त्यावर हे मंत्री महाशय म्हणाले की, भारताला सहकार्य करणारा प्रत्येकच देश पाकिस्तानचा शत्रू राहील आणि जर एखादा मुस्लिम देश असे करीत असेल तर पाकिस्तान त्या देशावरही क्षेपणास्त्र दागण्यासाठी मागे-पुढे पाहणार नाही.
पाकिस्तानच्या या मंत्र्याच्या विधानाचा व्हीडिओ पत्रकार नायला इनायत यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवर शेअर केला आहे, त्यानंतर ही सर्व प्रकरण जगासमोर आले.