सासवड : -सासवड शहरातील मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप करत, सासवड शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख राजेंद्र जगताप यांनी नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले अभिजीत जगताप यांच्या प्रचारसभेत सत्ताधार्यांवर जोरदार टीका केली. शहरातील वर्षानुवर्षे प्रलंबित कामांना वर्षपूर्तीत मार्गी लावू, असा विश्वास राजेंद्र जगताप यांनी व्यक्त केला. नागरिकांना येणार्या अडचणींचा विचार करता बदल हवा, बदल घडवा असे आवाहन करताना जगताप म्हणाले की, शहरातील विविध ठिकाणची दुरवस्था ही प्रशासन आणि सत्ताधार्यांच्या निष्क्रीयतेमुळे निर्माण झाली असून, अशा स्थितीत मतदान मागण्याचा तर प्रश्नच नाही; निवडणुकीला उभे राहण्याचाही त्यांना नैतिक अधिकार उरत नाही, असा आरोप त्यांनी केला. महाविकास आघाडीच्या उमेदवार अभिजित मधुकर जगताप यांच्या रूपाने सासवडला सुशिक्षित, सुसंस्कृत आणि लोकसेवेस तत्पर उमेदवाराचा पर्याय मिळत आहे, असा दावा शहरप्रमुखांनी केला. या उमेदवारामुळे सासवडकरांचा नगराध्यक्ष पदाचा वनवास संपेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.प्रचारादरम्यान नागरिकांमध्ये उमेदवाराबद्दल उत्साह आणि समाधान दिसत असल्याचेही त्यांनी सांगितले. लवकरच पक्षाचा वचननामा घरोघरी पोहोचणार असल्याची माहिती देत, नको कमळ, नको धनुष्य आता मशाल हेच उद्याचे भविष्य, अशी भूमिका त्यांनी मांडली. परिवर्तनाची हीच सुवर्णसंधी म्हणत, नागरिकांनी बदल घडवावा, असे आवाहनही त्यांनी केले.