मुंबई – विरोधात असताना आम्ही राजभवनात कधीतरी शिष्टमंडळ घेऊन येत होतो. पण रोज येत नव्हतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, नुतनीकरण केलेल्या वास्तुसाठी मला आनंद होत आहे. राज्यातील राजभवन हे देशातील सर्वोत्तम असेल. हे राजभवन 50 एकरात असून येथील हवा ही थंड असते. राजकीय हवा कशी ही असू द्या, असाही टोला त्यांनी लगावला.
या वास्तुचा जुना वारसा जपून आपण आधुनिकीकरणाकडे जात आहोत. आधुनिकीकरणाच्या नावाखाली सर्व तोडून मोडून टाकले जाते. मात्र येथे जपलेले आहे. या नवीन वास्तुमध्ये आनंददायी घटना घडाव्यात अशी अपेक्षा आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दरबार हॉलचे अप्रतिम असे सौंदर्य नव्या दमाने लोकांसमोर ठेवले आहे. एका बाजूला अथांग समुद्र, दुसऱ्या बाजूला सुंदर झाडं, ज्याला शहरातील जंगल असे देखील म्हणता येईल. याने हे राजभवन अधिकच सुंदर झाले आहे. पावसाळ्यात थुई थुई नाचणारे मोर आहेत. अशी वास्तू शोधून सापडणार नाही, असेही ते म्हणाले.