‘आम्ही काही पाकिस्तानी विमाने पाडली, आपले सर्व वैमानिक सुरक्षित’: भारतीय हवाई दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल सांगितले

नवी दिल्ली – भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर रविवारी भारतीय सैन्य, वायुसेना आणि नौदलाने संयुक्त पत्रकार परिषद घेत ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती दिली. लष्करी संचालक (DGMO) लेफ्टनंट जनरल राजीव घई, वायुसेनेचे DG एअर ऑपरेशन्स एअर मार्शल अवधेश कुमार भारती आणि नौदलाचे DGNO व्हाईस अॅडमिरल ए.एन. प्रमोद यांनी यावेळी बोलताना ऑपरेशनच्या यशाचा खुलासा केला.
DGMO घई यांनी सांगितले की, “ऑपरेशन सिंदूरमध्ये १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले, ज्यात IC-814 अपहरण आणि पुलवामा हल्ल्यातील यूसुफ अजहर, अब्दुल मलिक रऊफ आणि मुदासिर अहमद यांचा समावेश आहे.” एअर मार्शल भारती यांनी स्पष्ट केले की, भारतीय वायुसेनेने अत्यंत अचूकतेने केवळ दहशतवादी तळांनाच लक्ष्य केले. “मुरीदके येथील लष्कर-ए-तयबाचा गढ सटीक मिसाइल हल्ल्यात उद्ध्वस्त केला. कोणत्याही नागरी नुकसानाला आम्ही टाळले,” असे त्यांनी सांगितले.
पाकिस्तानच्या भारतीय विमाने पाडल्याच्या दाव्यावर भारती म्हणाले, “आम्ही युद्धस्थितीत आहोत. आमचा उद्देश आतंकी तळ नष्ट करणे हा होता आणि तो आम्ही साध्य केला. सर्व पायलट सुखरूप परतले. आम्ही काही पाकिस्तानी विमाने पाडली, त्यांना भारतीय हद्दीत येण्यापासून रोखले. नुकसानाची आकडेवारी सध्या गुप्त ठेवत आहोत, कारण ती शत्रूला फायदा देईल.” त्यांनी पुढे सांगितले की, युद्धबंदी असूनही पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले, जे नाकाम करण्यात आले.
भारताने या ऑपरेशनद्वारे दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका घेतली असून, सर्व उद्दिष्टे यशस्वीपणे पूर्ण केल्याचे सैन्याने स्पष्ट केले. युद्धबंदीच्या उल्लंघनास कठोर प्रत्युत्तर देण्याचा इशाराही देण्यात आला आहे.





