कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (शरद पवार गट) ‘स्वाभिमान सभा’ कोल्हापूरच्या दसरा चौकात पार पडली. या सभेत पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार अनिल देशमुख, आमदार रोहित पवार यांच्यासह पक्षातील अनेक मोठ्या नेत्यांनी भाषणं केली. यावेळी भाषणाच्या सुरुवातीला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील भाषण करत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील युतीविषयी राजश्री शाहू महाराजांचा संदर्भ देत मोठे वक्तव्य केले.
या सभेत बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘आज कोल्हापुरातल्या सगळ्या वस्तादांना भेटायला आमचा वस्ताद आला आहे. आमचा वस्ताद लय भयंकर आहे. त्यांनी जर कोणाला कुस्तीचं आव्हान दिलं तर समोरच्या पैलवानाची अवस्था बिकट होते. असे म्हणत त्यांनी अजित पवार गटाला टोला लगावला.
पुढे बोलताना,जितेंद्र आव्हाड म्हणाले, लोक शरद पवारांना विचारतात की तुम्हाला शिवसेना मान्य होते पण भाजपा का मान्य होत नाही? याबद्दल मी तुम्हा सर्वांना एक छोटा संदर्भ सांगतो. राजर्षी शाहू महाराज अंथरुणाला खिळून होते. तेव्हा ते मुंबईत होते. त्यावेळी त्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांना भेटायला बोलावलं होतं. शाहू महाराज हे प्रबोधनकार ठाकरे यांना कोदंड म्हणायचे. त्यांनी कोदंडांना बोलावून घेतलं आणि महाराज प्रबोधनकारांना म्हणाले, कोदंड तू आज मला एक वचन दे. तू प्रतापसिंह राजे यांचा खरा इतिहास महाराष्ट्रासमोर आणशील. कोदंड यांनी त्याप्रमाणे प्रतापसिंह राजेंचा इतिहास सर्वांसमोर आणला. त्यांचं जे हिंदुत्व होतं, प्रबोधनकार ठाकरे यांचं जे हिंदूत्व होतं ते हिंदुत्व आम्हाला मान्य आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, प्रबोधनकार ठाकरे यांचं हिंदुत्व आम्हाला आज मान्य आहे आणि उद्याही मान्य असेल. म्हणून आम्ही शिवसेनेचं हिंदूत्व स्वीकारतो. कारण ते मानवतावादी हिंदुत्व आहे. तुमचं (भाजपाचं) जे हिंदुत्व आहे ते अतिरेकी आणि हिंसावादी आहे. त्यामुळे ते आम्हाला मान्य नाही. हीच शरद पवारांची भूमिका आहे.