Satara | दुर्गम भागातील लोकांचे आपण देणे लागतो

पाचगणी, (प्रतिनिधी)- वाई- महाबळेश्वर- खंडाळा तालुक्यांच्या वाई विधानसभा मतदारसंघातील अतिदुर्गम भागात पोहोचण्याची हिंमत कोणतेही लोकप्रतिनिधी अथवा राजकीय पक्षाचे नेते करीत नाहीत.
परंतु, या भागातील नागरिकांशी सातत्याने संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेसचे नेते विराज शिंदे प्रयत्न करीत आहेत.
त्यांनी महाबळेश्वर तालुक्यातील कांदाटी व सोळशी खोऱ्यातील अतिदुर्गम भागाचा दौरा नुकताच करुन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या दौऱ्याच्या काळात त्यांनी मध्यरात्री नावेतून प्रवास करुन नदीच्या पलिकडे वाट पाहणाऱ्या नागरिकांची भेट घेतली.
या भागाचे आमदार मकरंद पाटील यांनी गेल्या पंधरा वर्षांच्या काळात या भागात एकदाही पाऊल टाकले नाही अशी तक्रार या गावच्या नागरिकांनी यावेळी केली.
रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण अशा अनेक मुलभूत पायाभूत सुविधांबाबतीत हा भाग नेहमीच दुर्लक्षित राहिला असून विकासाच्या नावावर केवळ रस्त्याची किरकोळ-कारकोळ कामे झाली आहेत. रस्त्यांची दोन-तीन महिन्यांतच दुर्दशा झाली.
मात्र, त्याचे श्रेय घेणारे फलक मात्र आमची थट्टा करीत उभे आहेत, अशी व्यथा नागरीकांनी शिंदे यांच्याकडे मांडली.
विराज शिंदे म्हणाले, “महाबळेश्वर भागातील मतदान खंडाळा आणि वाई या दोन विभागांच्या तुलनेत कमी आहे. राजकीय गणितांचा विचार केला तर वाई आणि खंडाळ्याच्या मतांवर कोणताही आमदार निवडून येतो.
त्यामुळे महाबळेश्वर तालुक्याचा दौरा करण्याच्या फंदात कोणताही नेता पडत नाही. परंतु, ज्या भागात आपण काम करतो. त्या भागातील प्रत्येक गावातील नागरिकांशी आपले नाते असते, हे विसरुन जमणार नाही. हा त्या प्रत्येक गावाशी आणि नागरिकांशी अक्षरशः द्रोह आहे. येथील प्रश्न मार्गी लावण्यासाठी कार्यरत आहे.”
या दौऱ्यात विराज शिंदे यांनी सिंधी, मोरनी, महालुंगे, आरव, पुनर्वसन मोरणे, वळवण, चकदेव, सालोशी, लामज, निवळी, आकल्पे, रामेघर तसेच कांदाटी व सोळशी खोऱ्यातील सर्व गावांचा दौरा केला. या दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी काही गावांमध्ये नागरिकांशी संवाद देखील साधला.
यावेळी त्यांच्यासोबत शशिकांत भातोशे, भूषण मोरे, सतीश चव्हाण, प्रकाश चव्हाण, हरीश निवळे, कृष्णा जाधव, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी तथा स्थानिक ग्रामस्थ आदी उपस्थित होते.





