हैदराबाद – आपल्याला लोकांच्या अर्थात पीपल्स अजेंड्याची गरज आहे. दोन किंवा तीन मुख्यमंत्र्यांनी एकत्र येउन स्थापन केलेल्या राजकीय आघाडीची नाही. भूतकाळात अशा अनेक आघाड्या झाल्या, त्यातून फार काही साध्य झालेले नाही अशी ठोक प्रतिक्रिया तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी व्यक्त केली.
गेल्या काही काळात राव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह अनेक पक्षांच्या नेत्यांच्या भेटी गाठी घेतल्या होत्या. त्यामुळे ते पुन्हा तिसऱ्या आघाडीची मोर्चेबांधणी करत असल्याच्या चर्चा होत्या. मात्र हा अंदाज त्यांनी फेटाळला. आपली अशा कोणत्याही आघाडीची तयारी चाललेली नसून आपण लोकांच्या अजेंड्यावर काम करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. आपल्याला एका कॉमन अजेंड्याची, एकात्मिक कृषी औद्योगिक धोरणाची गरज असल्याचे ते म्हणाले. दोन तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊन आघाडी स्थापन केल्याने काही साध्य होणार नाही.
तेलंगणा राष्ट्र समितीच्या 21 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या 3 हजार पदाधिकाऱ्यांसमोर ते बोलत होते. लोकांनी आपली बरीच खिल्ली उडवली, पण आपण येथपर्यंत मजल मारली. आता आपल्या राष्ट्रीय पातळीवर महत्वाचे योगदान द्यायचे असल्याचे आणि तेलंगणा राष्ट्र समिती ही भारतीय राष्ट्र समिती झाली पाहिजे असे त्यांनी नमूद केले.