शंकर दुपारगुडे
कोपरगाव – मी पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर राज्यातील राजकारणात झालेल्या सत्तासंघर्षातून खूप काही शिकायला मिळाले. हा मिळालेला मोठा अनुभव माझ्या भविष्यातील राजकीय कारकिर्दीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, असे मत आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केले.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस मित्र पक्षाच्या वतीने उमेदवारी करून भाजप आमदार असलेल्या स्नेहलता कोल्हे यांचा पराभव काळे अटीतटीच्या लढतीत विजयी झाले. आ. काळे यांच्या रूपाने काळे परिवाराची तिसरी पिढी आमदाराकीच्या रूपाने राज्याच्या राजकारणात आपला ठसा उमटवत आहे. राज्यातील तरुण आमदारांपैकी काळे हे एक आमदार आहेत. आमदारकीच्या पहिल्या दिवसाचा अनुभव दैनिक प्रभातच्या प्रतिनिधी चर्चा करताना त्यांनी वरील भावना व्यक्त केली. ते म्हणाले, गेल्या एक महिन्यापासून सत्तासंघर्षाचा सामना मी जवळून अनुभवत होतो. मी जेव्हा निवडून आलो, तेव्हा विरोधी पक्षाचा आमदार आहे, या मानसिकतेमध्ये होतो. परंतु विरोधात असलो, तरी मतदारसंघाचे विकास कामे करण्याचा चंग बांधला होता.
पण सुदैवाने एक महिन्यानंतर सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून आज वावरतोय. सत्तासारीपाठाच्या राजकीय बदलातून निश्चितच विकास कामाला बळ देणारी घटना राजकीय पटलावर घडली आहे. त्याचा फायदा माझ्या मतदारसंघातील विकासकामे करण्यासाठी होणार असल्याचे ते म्हणाले. विधान भवनामध्ये पहिल्यांदा गेल्यानंतर अनेक प्रश्न मनामध्ये घोळत होते. परंतु जुन्या राजकीय संबंधातून एकमेकांची ओळख होते. त्यातूनच नव्या आलेल्या अनुभवातून मतदारसंघाच्या हिताचा निर्णय घ्यायला गती मिळणार आहे.
राज्यातल्या अनेक राजकीय व्यक्तींच्या ओळखी झाल्या. त्यांचे वैयक्तिक अनुभव कामकाजाच्या माध्यमातून पाहता आले. काही गोष्टी चांगल्या आणि वाईट, दोन्ही बाबींचा अनुभव कमी काळात मला मिळाला. विरोधी बाकावर बसण्याच्या विचारात असलेला मी आमदार असताना अचानक सत्तेच्या बाजूने बसून सत्ताधारी आमदार असल्याचा हा अनुभव व आनंद वेगळाच आहे, असेही आशुतोष काळे म्हणाले. मतदारसंघामध्ये सत्ताधारी पक्षाच्या वतीने मंत्रिपदाची संधी असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र मला मंत्रिपदापेक्षाही सत्ताधारी मित्रपरिवाराकडून माझ्या मतदारसंघातील विविध विकास कामे करून घेण्यात मी धन्यता मानतो. मला माझ्या मतदारसंघाचा विकास होणे महत्त्वाचे वाटते. तरीही वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर मंत्रिपदाची जबाबदारी दिली, तर ती मी आनंदाने स्वीकारीन, असे म्हणत आपल्या आमदारकीचा पहिला अनुभव काळे यांनी प्रभातच्या प्रतिनिधींसमोर व्यक्त केला.
काळे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर राज्याच्या राजकीय पटलावर शिवसेना-भाजप युती असल्याकारणाने राष्ट्रवादीचे आमदार काळे विरोधी पक्षाचे आमदार झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांत चिंता निर्माण झाली होती. यापूर्वी माजी आमदार अशोकराव काळे हे दहा वर्षे विरोधी आमदार म्हणून काम केले होते. त्यावेळी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. मतदारसंघांमध्ये अपेक्षित विकासकामे करण्यासाठी निधी हवा असतो. तो मिळवताना खूप कसरत करावी लागली होती. परंतु काळे परिवाराचे राज्यातील सर्वच नेत्यांबरोबर सलोख्याचे संबंध असल्याने विकासकामांना अडथळा आला नाही. सध्याची राजकीय स्थिती पूर्ण बदलली आहे.
संबंध जरी चांगले असले, तरी राजकीय कुरघोड्या वाढल्या आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाच्या आमदारांना गेल्या पंचवार्षिकमध्ये कटू अनुभव आले होते, याची चिंता समर्थकांना लागली होती. परंतु राज्याच्या राजकारणामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस मित्र पक्षांनी एकत्र येऊन सर्वाधिक जागा मिळवलेल्या भाजपला विरोधी बाकावर बसवून सत्ता स्थापन केली.
त्यामुळेच आमदार काळे हे सत्ताधारी पक्षाचे आमदार झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. आमदार काळे यांची ही चिंता बऱ्यापैकी मिटली आहे.