मुंबई : शिवसेना व भाजपात सत्तेचा 50:50 फॉर्म्युला ठरला नव्हता असं चक्क खोटं बोलणाऱ्या भाजपाला माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीच घरचा आहेर दिला आहे. आम्ही शिवसेनेला फसवलं ही आमची चूकच आहे. पण आमच्या चुकीचा फायदा कॉंग्रेस, राष्ट्रवादीला झाला, अशी स्पष्ट कबूली मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. मात्र, एक ना एक दिवस ही चूक आम्ही नक्कीच सुधारू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सत्तेतील वाटपावरून ऑक्टोबर 2019 मध्ये शिवसेना-भाजपाची युती तुटली होती. सत्तेमध्ये अर्धा वाटा देण्याबाबत कोणताही शब्द शिवसेनेला दिला नव्हता, असे भाजपाचे अध्यक्ष अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे नेतेमंडळी सांगत होते. मात्र, गुरुवारी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी हे सत्यच समोर आणले.
विरोधकांवर टिका करताना मुनगंटीवार म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी तुमची तीन महिन्यांची मैत्री असेल, पण आमची मैत्री 30 वर्षांपासूनची जुनी आहे, असे म्हणताच सत्ताधारी बाकावरून म्हणून तुम्ही फसवलं… अशी मिश्किल टिपणी केली. त्यावर होय आम्ही त्यांना फसवलं, आमची चूक झाली, पण आमच्या चुकीचा तुम्ही फायदा घेतला, असा टोमणा त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला मारतानाच आमच्या चुकीचा तुम्ही फायदा घेऊ नका. आम्ही केलेली ती चूक एक दिवस नक्कीच सुधारू, असेही ते म्हणाले. मात्र, मुनगंटीवारांनी ही कबूली दिली, त्यावेळी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सभागृहात नव्हते.
मध्य प्रदेशातील कॉंग्रेसचे युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी नुकताच कॉंग्रेसचा राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश केला. त्याचा दाखला देत एखादा ज्योतिरादित्य शिंदे आमच्याकडे पुढील काळात येईल, अशी आशाही त्यांनी यावेळी बोलून दाखविली.