कात्रज, दि. 5 (प्रतिनिधी) -राजकारणाची चीड येते, हिंमत असेल तर निवडणुकांना सामोरे जा. प्रत्येकजण सोईने प्रभाग रचना बदलत आहे. मात्र, कितीही जोड आणि तोडा आम्ही निवडणूक लढवायला तयार असून आगामी महापौर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच असेल, असा दावा मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री शिंदे आणि उमुख्यमंत्री फडणवीस यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा प्रभाग रचना बदलण्याचा निर्णय घेत प्रभाग चार नगरसेवकांचा केला. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे बोलत होते.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात पुणे आगामी महापालिका निवडणुकीसाठी घेण्यात आलेला त्रिसदस्यीय प्रभागाचा निर्णय रद्द करीत चार नगरसेवकांचा प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आता, या निवडणुकीसाठी पुन्हा आरक्षण, प्रभाग रचना अशी प्रक्रिया राबवावी लागणार असल्याचने याबाबत मोरे यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे.
राज्यात सत्ता आल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारचे अनेक निर्णय बदलले. मात्र, प्रभाग रचना बदलण्याचे कारण काय? असा प्रश्न मोरे यांनी उपस्थित केला. 2017 मध्ये भाजपच्या फायद्याची प्रभाग रचना झाली, त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या फायद्याची प्रभाग रचना केली. जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला मात्र राजकारण्यांना वेळ नाही. आता, राजकारणाचीच चीड यायला लागली आहे. प्रत्येकाने आपापल्या सोईने प्रभाग रचना बदलली तरी कात्रज मनसेचा बालेकिल्ला राहील आणि आगामी निवडणुकीनंतर महापौर मनसेचा असेल, असेही वसंत मोरे यांनी सांगितले.