आठवडे बाजार बंद असल्याने कर मिळणार नाही
डोर्लेवाडी – करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावागावांतील आठवडे बाजार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने याचा थेट परिणाम ग्रामपंयतींना बसला आहे. या बाजारातून करररुपी मिळाणाऱ्या हजारो रुपयांवर पाणी फेरावे लागले आहे. याचा फटका डोर्लेवाडी आणि झारगडवाडी ग्रामपंचायतींनाही बसला आहे. डोर्लेवाडी ग्रामपंचायतीचा दर गुरुवारी आठवडे बाजारात असतो.
या आठवडे बाजारांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात आपल्या शेतातील ताजा भाजीपाला घेऊन येत असतो; मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर या आणि पुढच्या गुरुवारचा आठवडे बाजार बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांच्या भाजीपाला आणि इतर तरकारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.
डोर्लेवाडीतील आठवडे बाजारात एकूण 60 विक्रेते येत असतात. यात प्रत्येक शेतकऱ्याला खर्च वजा जाता अंदाजे 1500 रुपयांचा नफा मिळतो, तर ग्रामपंचायतला यातून 1100 ते 1200 रुपये कर मिळतो. मात्र, करोनामुळे यंदा शेतकऱ्यांसह ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या उत्पन्नावर पाणी फेरावे लागणार आहे, अशी माहिती डोर्लेवाडीचे सरपंच बाळासाहेब सलवदे यांनी सांगितले.
झारगडवाडी एकूण 150 शेतकरी येत असतात. यात प्रत्येकी एका शेतकऱ्याला विक्रीला आणलेल्या भाजीपाल्यातून खर्च वजा जाता अंदाजे 2 हजार रुपये नफा मिळतो. तर ग्रामपंचायतला कररुपी 1700 ते 1800 रुपये मिळतात. हा ग्रामपंचायतचा कर बुडणार आहे. यात एकूण 3 लाख रुपयांची उलाढाल त्या दिवशी होत असते.
मात्र, या आणि पुढच्या रविवारी आठवडे बाजार बंद राहणार असल्याने मोठी उलाढाल ठप्प होणार आहे. त्यातही पुढे जर हा निर्णय वाढला तर किती तोटा सहन करावा लागणार हे सांगता येणार नाही, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी दिली.
डोर्लेवाडीचा 2400, झारगडवाडीचा 3600 रुपयांचा कर बुडणार
डोर्लेवाडीचा दर गुरुवारी तर झारगडवाडी ग्रामपंचायतीचा आठवडे बाजार दर रविवारी भरवण्यात येतो. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर 31 मार्चपर्यंत बाजार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे, त्यामुळे डोर्लेवाडीचा दि. 19 व दि. 26 तर झारगडवाडीचा दि. 22 व दि. 29चे आठवडा बाजार भरणार नसल्याने याचा थेट फटका शेतकऱ्यांसह ग्रामपंचायतीला बसणार आहे. डोर्लेवाडीला ग्रामपंचायतींचा दोन आठवड्यांचा 2400 तर झारगडवाडी ग्रामपंचायतीला 3600 रुपयांच्या करावर पाणी सोडावे लागणार आहे.