प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 18 -शहरात समान पाणी देण्यासह, नेमका पाणी वापर किती, हे निश्चित होण्यासाठी महापालिकेकडून समान पाणी योजन अंतर्गत सुमारे 3 लाख 15 हजार पाणी मीटर सोसायट्या तसेच व्यावसायिक मिळकतींना बसविले जाणार आहेत. त्यातील 86 हजार 500 मीटर बसविण्यात आले आहेत. काही सोसायट्यांनी मीटर बसविल्यानंतर मीटरच्या आधी जलवाहिनीला टॅप मारून मीटरला बायपास केल्याचे प्रकार कर्वेनगरमध्ये समोर आले आहे. असा प्रकार पुन्हा आढळल्यास कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. दरम्यान, मीटर बसविण्यासाठी पालिकेने शहरात 132 झोन केले असून, 46 झोनचे काम पूर्ण झाले असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
महापालिकेकडून शहरात2500 कोटी रुपये खर्चून समान पाणी योजना राबविण्यात येत आहे. त्यात 1600 किलोमीटरच्या नवीन जलवाहिन्या टाकणे, 83 नवीन पाण्याच्या टाक्या उभारणे तसेच सव्वातीन लाख पाणी मीटर बसविणे या कामांचा समावेश आहे. हे पाण्याचे मीटर जलशुद्धीकरण केंद्रातून बाहेर पडणारे पाणी, जलवाहिन्या, टाक्या तसेच सोसायट्यांच्या नळजोडांना असणार आहेत. त्यामुळे नेमके किती पाणी कोणत्या भागात दिले याचे पहिल्यांदाच ऑडीट होणार आहे. या कामांअंतर्गत आतापर्यंत सुमारे 86 हजार 500 मीटर बसविण्यात आले आहेत. तर उर्वरित काम 31 मार्च 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. महापालिका हे मीटर मोफत बसवित आहे. मात्र, मीटर बसविल्यास आपला पाणी वापर उघड होईल आणि पाण्याचे बिल जादा भरावे लागेल, असा समज करून घेत सोसायट्या मीटर बसविण्यास मज्जाव करत आहेत. त्यामुळे पालिकेकडून थेट पोलिसांचीही मदत घेतली जात आहे. काही सोसायट्या मीटर बसविण्यात आल्यानंतर मीटरच्या अलिकडे नवा नळजोड घेऊन मीटर बायपास करत आहेत.
अशी सापडली “बायपास’ चोरी
महापालिकेनेजे मीटर बसविले आहेत, त्यांचे ऑनलाइन रिडींग घेतले जात आहे. त्यासाठी एक स्काडा सिस्टीम उभारण्यात आली असून, त्यात मीटरचे रिडींग तसेच तो चालू आहे का बंद हे लक्षात येते. कर्वेनगर भागात पालिकेने काही मीटरचे रिडींग पाहिले असता ते शून्य असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पालिकेने मीटर तपासले तर ते चालू होते. नंतर संशय आल्याने पालिकेने जलवाहिनी तपासली असता मीटरला बायपास करून नवीन नळजोड घेतल्याचे निदर्शनास आले.
कर्वेनगर येथील गणेशनगर परिसरात मीटर बसवल्यानंतर तेथील रहिवाशांनी सोसायटीच्या आवारात मीटरच्या आधीच एक टॅप मारून पाणी दुसऱ्या पाईपने वळवले. त्यामुळे मीटरवर पाण्याची नोंद होत नव्हती. पाणीपुरवठा विभागाने तपासणी करून ही पाणी चोरी शोधून काढली. पुन्हा असे प्रकार घडल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.
– विक्रम कुमार, महापालिका आयुक्त