वाल्हे -माणसाच्या जीवनामध्ये पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याची मोठी आवश्यकता असते. आपण मोठा दुष्काळही पाहिला आहे. आता मुबलक असणारे पाणी उन्हाळ्यात मात्र कमी पडते. पाण्याच्या अनिर्बंध वापरामुळे आपल्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे पाण्याचा जपून वापर करायला हवा, असे मत पिंगोरीच्या सरपंच विद्या यादव यांनी व्यक्त केले.
पिंगोरी (ता. पुरंदर) येथील जयगणेश जलसागर 100 टक्के भरल्याने सरपंच विद्या यादव व उपसरपंच वसंत शिंदे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पोलीस पाटील राहुल शिंदे, माजी उपसरपंच धनंजय शिंदे, ग्रामपंचायत सदस्य ठकसेन भोसले, निवृत्त शिक्षक राजाराम शिंदे, दिलीप शिंदे, जालिंदर गायकवाड, सदाशिव शिंदे, ग्रामसेवक अनिल हिरासकर उपस्थित होते.
यादव म्हणाल्या की, 1972 मध्ये तलावाची निर्मिती करण्यात आली. तेव्हापासून शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी हा तलाव वरदान ठरला आहे. शेतकऱ्यांनी पिकांना पाटाने पाणी न देता ठिबक सिंचन, तुषार सिंचनासारख्या आधुनिक पद्धतीचा वापर करायला हवा, असे त्यांनी नमूद केले.