राजगुरूनगर -खेड तालुक्यात पाणीटंचाईची तीव्रतेची झळ असल्या तरीही 7 गावांसह 62 वाड्यावस्त्यांना 7 टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती गटविकास अधिकारी अजय जोशी यांनी दिली.
गेल्या उन्हाळ्यात 26 जानेवारीपासून तालुक्यात टॅंकर सुरू होऊन मे अखेरपर्यंत 15 टॅंकरने 14 गावांसह 138 वाड्यावस्त्या मिळून 33 हजार 371 लोकसंख्येसह जनावरांना पाणीपुरवठा करावा लागला होता. नोव्हेंबर 2019 अखेरपर्यंत परतीच्या पावसामुळे सर्वत्र जलस्त्रोत पूर्णक्षमतेने भरून गेल्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत मिळाली तर धरण, पाझर तलाव, विहिरींमध्ये जलसाठा बऱ्यापैकी उपलब्ध असल्यामुळे जनावरांच्या पिण्याची पाणी समस्या कमी होण्यास मदत झाली आहे.
यंदा उन्हाळ्यात 25 एप्रिलपासून शासकीय टॅंकरने पश्चिम भागातील वाशेरे, साबुर्डी, गडद, नायफड, तर पूर्व भागातील वरुडे, गुळाणी, वाकळवाडी या गावांसह वाड्यावस्त्यांना तसेच वाडा, आंभु शेंदुर्ली, कोयाळी तर्फे वाडा, वडगाव पाटोळे या गावांच्या वाड्यावस्त्यांना 7 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे, त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत नसल्याचे चित्र आहे.
करोना प्रादुर्भावामुळे देशभरात लॉंकडाऊन 22 मार्चपासून सुरू झाल्याने प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली असताना दुसरीकडे पाणीटंचाई काळातील नियोजन करण्यासाठी मागणीनुसार आलेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्याचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांच्याकडे आल्यामुळे वेळेत टॅंकर सुरू होण्यास मदत मिळणार आहे.
थेट दिले जातेय पाणी
लॉकडाऊन कालावधीत शहरी भागातून अनेक नागरिक आपल्या मूळ गावी आल्यामुळे टॅंकरने पाणी विहीर अथवा साठवणूक करणाऱ्या टाक्यांमध्ये न टाकता लोकांना टॅंकरमधूनच पाणी वाटप करण्यात येत असल्याने टॅंकरची संख्या न वाढवता फेऱ्या वाढवल्यामुळे तक्रारी कमी झाल्या आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली.