Water Crisis – उजनी धरण क्षेत्रात गेल्या वर्षी पावसाने चांगली हजेरी लावली असली, तरी गेल्या महिन्यापासून वाढलेल्या कडक उन्हामुळे धरणाखालील गावांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. भीमा नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे पडल्याने काठच्या गावांमधील शेती पिके धोक्यात आली असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि लोकप्रतिनिधींच्या १६ एप्रिलच्या बैठकीनंतर १८ एप्रिलपर्यंत भीमा नदीत पाणी सोडण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, १९ एप्रिल उजाडला तरी उजनी प्रशासनाला जलसंपदा विभागाकडून कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत. प्रशासकीय पातळीवर हालचाली नसल्याने आवर्तनाच्या केवळ चर्चाच सुरू असून प्रत्यक्ष विसर्ग रखडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. वाढत्या तापमानामुळे भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. विहिरी, ओढे आणि नाले कोरडे पडू लागल्याने गावच्या पाणीपुरवठा संस्था अडचणीत आल्या आहेत. पिके जळू लागल्याने शेतकरी पाण्याच्या शोधात दाहीदिशा भटकत असून, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. भीमा नदी यापूर्वी उजनी धरणाखालील गावातील शेतकऱ्यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना भेटून भीमा नदी पात्रात पाणी सोडण्याची मागणी केली होती, या मागणीचा पाठपुरावा जलसंपदा मंत्र्याकडे करणार असल्याचे पाटील यांनी आश्वासित केले होते. त्यानुसार पाटील यांनी पाठपुरावा केला; मात्र अद्याप पाणी सोडण्यात आले नाही. उजनी धरणाची सद्यस्थिती सोलापूरसह पुणे, अहिल्यानगर जिल्ह्याचे वरदायिनी असलेल्या उजनी धरणाचा एकुण पाणीसाठा ३, ३२०. ०१ द.ल.घ.मी. आहे. तर, १९ एप्रिल रोजीचा धरणातील पाणीसाठा ४०९. ९८ द.ल.घ.मी (उपयुक्त साठा) आणि २२१२.७९ द.ल.घ.मी असा एकूण साठा उपलब्ध आहे. टक्केवारीत मोजल्यास २७.०२ टक्के इतका साठा असून गतवर्षी याच दिवशी उजनीत ०.०० टक्के साठा उपलब्ध होता. “अल निनोच्या संकटामुळे यंदा पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उजनीतील पाणी काटकसरीने वापरणे आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार ३१ ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले असून, सध्या उन्हाळ्यात एकच आवर्तन देण्याचे ठरले आहे. दुसऱ्या आवर्तनाचा विचार परिस्थिती पाहून केला जाईल.” – जयकुमार गोरे, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री.”