Riteish Deshmukh : अभिनेता रितेश देशमुख त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमी चर्चेत असतो. कोणताही नवीन चित्रपट प्रदर्शित झाला आणि रितेशने तो पाहिला तर त्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून तो व्यक्त होत असतो. नुकताच इक्कीस हा बहुचर्चित चित्रपटाचा ग्रँड प्रमिअर मुंबईत पार पडला. या प्रीमिअरला रितेशने हजेरी लावली होती. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. इक्कीस चित्रपटाच्या ग्रँड प्रीमिअरला कलाविश्वातील सलमान खान, सनी देओल यांसह दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी इक्कीस चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. “” अक्षरशः निशब्द झालो. हा केवळ एक युद्धपट नाही, तर हा एक असा अनुभव आहे जो तुम्हाला थेट रणांगणाच्या वास्तवात नेऊन सोडतो. श्रीराम राघवन यांनी हा सिनेमा अत्यंत ताकदीने उभा केला आहे.” अशी प्रतिक्रिया रितेश देशमुखने इंन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये व्यक्त केली आहे. या पोस्टमध्ये त्याने दिवंगत ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्याविषयी देखील भावना व्यक्त केल्या आहेत. “मोठ्या पडद्यावर धरमजींना पाहणं माझ्यासाठी खूप भावनिक होतं. ते जेव्हा जेव्हा स्क्रीनवर दिसायचे, तेव्हा मी शिट्ट्या आणि टाळ्या वाजवल्या. प्रत्येक क्षण जिद्दीने जगणं काय असतं, हे त्यांनी शिकवलं. धरमजी, तुमची आणि तुमच्या त्या अफाट प्रतिभेची आम्हाला कायम आठवण येईल.” अशा शब्दांत रितेशने धर्मेंद्र यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. या चित्रपटात बॅालिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा मुख्य भूमिकेत आहे. त्याच्या कामाचे देखील रितेशने कौतुक केले आहे. चित्रपटात अभिनेता जयदीप अहलावत याची देखील महत्वाची भूमिका आहे. याविषयी देखील रितेशने कौतुक केले आहे. तसेच अशा धाडसी कथा प्रेक्षकांसमोर आणल्याबद्दल त्याने निर्माते दिनेश विजन यांचेही मनापासून अभिनंदन केले आहे. हेही वाचा : Shweta Tiwari: नवीन वर्षाआधी श्वेता तिवारी वेकेशनवर; परदेशातून शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल