वारवंड होणार टॅंकरमुक्त

भोर (प्रतिनिधी) – वर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या वारवंड (ता. भोर) गावाची पाणीटंचाई लवकरच मिटणार आहे. यासाठी नीरा-देवघर धरणातील विहीरीतून गावासाठी पाणी पुरवठा होणार आहे. भविष्यात गावाची पाणी टंचाई कायमची दूर होणार असल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.
वारवंड गावात आमदार संग्राम थोपटे यांच्या स्थानिक विकास निधी मधून 5 लाख खर्चाच्या 10 एचपीची मोटर आणि जलवाहिनीच्या कामाचे उद्घाटन आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी बापू शिरवले, पोलीस पाटील सुधीर दिघे, सुरेश राजिवडे, संजय मळेकर, किसन कंक, बापू वेणुपुरे, धोंटिबा मालुसरे, शंकर पोळ, प्रकाश पारठे, बबन मालुसरे, जिजाबा पारठे, नंदू सोनी, प्रकाश पारठे, अभिषेक येलगुडे, विष्णू मळेकर व ग्रामस्थ उपस्थित होते. वारवंडला सभामंडपासाठी 5 लाख मंजूर केले आहेत. मागील 15 वर्षांपासून उन्हाळ्यामध्ये गावात पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. पाणी समस्या दूर करण्यासाठी आमदारांनी 5 लाख रुपये निधी दिला आहे. असे सरपंच लक्ष्मण दिघे यांनी सांगितले.
नीरा-देवघर धरण परिसरातील रिंगरोडवरील आणि महाड-भोर रस्त्यावरील गावांत उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवते. अनेक गावांची लोकसंख्या कमी आणि खर्च अधिक हे मापदंडात बसत नाही, त्यामुळे अनेक गावातील पाणी योजना बंद आहेत. अशा गावांत सरकारी स्तरावर निकष शिथल करून भविष्यात पाणी टंचाई कायमची दूर केली जाईल
– संग्राम थोपटे आमदार, भोर





