Maharashtra Politics News : काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि नेतृत्वाच्या दुर्लक्षामुळे चिमूर येथील काँग्रेसचे माजी आमदार अविनाश वारजुकर आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश वारजुकर या दोन्ही सख्ख्या भावांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. गुरुवारी मुंबईत ते भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मागील दोन विधानसभा निवडणुकांमध्ये चिमूर मतदारसंघातून सतीश वारजुकर यांना पक्षांतर्गत असहकार्यामुळे पराभव पत्करावा लागला होता. तर माजी आमदार अविनाश वारजुकर यांनाही जिल्हा राजकारणात योग्य स्थान दिले जात नसल्याने ते नाराज होते. देवेंद्र फडणवीसांची भेट राजीनामा देण्यापूर्वी वारजुकर बंधूंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर मुंबईतील भाजपच्या पक्ष कार्यालयात सकाळी सुमारे दहा वाजता ते अधिकृत प्रवेश करणार असल्याचे अविनाश वारजुकर यांनी सांगितले. राजीनामा पत्रात अंतर्गत गटबाजी आणि नेतृत्वाचे दुर्लक्ष हेच मुख्य कारण असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या घडामोडीमुळे चिमूर आणि ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघात तसेच आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.