पुणे -शेकडो वर्षांपासून आषाढी वारीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा अखंडपणे सुरू आहे. दोन्ही संतांच्या पालख्या पुणे मुक्कामी असतात. या दोन्ही सोहळ्यांमध्ये लाखो वारकरी-भाविक असतात. त्या सर्वांचे प्रवास, भोजन, आरोग्य, वेळापत्रक आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सुरक्षा…या सर्वांचे व्यवस्थापन अर्थात “मॅनेजमेंट’ इतके अत्युत्तम असते, की व्यवस्थापन शास्त्राचे धडे गिरवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “वारी’ हा सोहळा जणु “मॅनेजमेंट गुरू’ ठरतो.
वारी म्हणजे, आनंदसोहळा..
वारकऱ्यांचा हा मेळा जगभरातील लोकांसाठी एक उत्सुकतेचा आणि तितकाच आश्चर्यकारक सोहळा असतो. लाखो वारकऱ्यांना एकत्र आणणाऱ्या या दिंड्यांचे “मॅनेजमेंट’ कसे असते, हा अभ्यासाचा विषय आहे. या वारीत सर्व जण आनंदी असतात. त्यांचे ध्येय एकसमान असते. कदाचित हे “मॅनेजमेंट’ आपल्याला वारी शिकवते.
स्वयंशिस्त..हेच मुख्य सूत्र
एखाद्या ठिकाणच्या मुक्कामानंतर सकाळी बरोबर सहा वाजता वारकरी पुढच्या प्रवासाला निघतात. पहिला विसावा, त्यानंतर भोजन, त्यानंतर पुन्हा पुढच्या गावाची ओढ आणि त्यानंतर रात्रीचा मुक्काम हे वरकरणी सोपे वाटत असले, तरी यामागे असते ते नियोजन. यात स्वयंशिस्त हे प्रमुख सूत्र आहे, ज्याद्वारे ही सर्व मंडळी एकाच दिशेने चालत असतात.
नको भेद, नको भ्रम
दिंडीत सहभागी वारकरी आणि सेवेकरी यांची लगबग पहाटे तीन वाजता सुरू होते. सामान ठेवण्याची व्यवस्था, भोजनाची व्यवस्था याबाबत प्रत्येकाला स्वतंत्र जबाबदारी दिली जाते. ते सर्व जण आपापली जबाबदारी चोख पार पाडतात. तरुणांना ज्येष्ठ व्यक्ती मार्गदर्शन करतात. ज्येष्ठ-कनिष्ठ, भेद असे प्रकार वारकरी मानत नाहीत. कदाचित हेच त्यांच्या व्यवस्थापनाचे इंगित आहे.
गैरसोय टाळण्याकडे कल
ऊन, वारा, पाऊस वातावरणातील बदल सहन करत हे वारकरी पंढरीला जातात. दरम्यान, प्रत्येक दिंडीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी सकाळचा नाश्ता, दुपारी आणि संध्याकाळचे जेवण पुरवले जाते. परंतु, दिंडीत मर्यादेपेक्षा वारकऱ्यांची जास्त संख्या असल्यास आणि पाऊस पडल्यास वारकऱ्यांची गैरसोय होऊ शकते. अशा स्थितीत अनेक दिंडीमालक वारकऱ्यांची संख्या कमी कशी राहिल याकडे लक्ष देतात. येथेही व्यवस्थापन शास्त्र उपयोगी ठरते.
एकमेकांची मदत..
वारी सोहळा म्हणजे, आपल्या सामाजिक एकरुपतेचे प्रतीक आहे. वारकऱ्यांना समाजाच्या सर्व स्तरांतून मदत केली जातेच. पण, सोहळ्यात सहभागी प्रत्येकजण एकमेकांना मदत करत असतो. जात-धर्म-पंथ यांच्या पलिकडे गेलेले हे सर्व लोक असतात. त्यामुळे आपसूकच “टीम वर्क’ येथे दिसून येते.
पंढरीची वारी म्हणजे स्वयंशिस्त. कुठलंही निमंत्रण न देता आषाढाचे ढग आकाशात येतात, त्याबरोबर वारकरीही संतांच्या गावी दाखल होतात. पाऊस-शेती आणि वारीचे वेळापत्रक वारकऱ्यांनी शेकडो वर्षे सांभाळले आहे. शेतीची कामे आटोपून वर्षातील चारही पंढरीच्या वाऱ्या वारकरी करतात. म्हणजेच, पंढरीची वारी ही निसर्गचक्राशी बांधलेली आहे. वारकरी हा शेतकरीच असतो. तो शेत एका ओळीत नांगरतो. त्याच शिस्तीने बियाणे पेरतो. त्यामुळे पिके उगवलेली शेते प्रमाणबद्ध दिसतात. ही शिस्त शेतीतील प्रत्येक कामात असते. त्यामुळे वारीच्या वेळा पाळणारे, रांग न मोडता स्वयंशिस्तीने चालणारे वारकरी आपल्यालाही शिकवण देतात. ही शिस्त नैसर्गिकरित्या त्यांच्या अंगातच भिनलेली असते. शिवाय “भूतदया गाईपशूचें पालन। तान्हेल्या जीवन वनामाजी।।’ अशी सर्व जीवांप्रती वारकऱ्याच्या मनात करुणा असल्याने त्याच्याकडून आगळीक होणे शक्यच नाही.
– डॉ. श्रीरंग गायकवाड, संत साहित्य अभ्यासक
सूचनांचे स्वयंपालन…
पालखी सोहळा कालावधीत भल्या पहाटे स्नान करून काकडा आरतीने श्री क्षेत्र पंढरीच्या दिशेने पडणारी लाखो वारकऱ्यांची पावले ठरलेल्या वेळेतच नाश्ता, दुपारी जेवण करत रात्रीचा मुक्काम गाठतात. मुखोद्गत असलेले अभंग, टाळ-मृदंगाचा गजर, “ज्ञानोबातुकाराम’…चा नामघोष करत दररोज किमान 20 ते 25 किलोमीटरचा टप्पा अगदी लीलया पार पाडतात. या नियोजनासाठी फक्त दरदिवशी मुक्कामाच्या ठिकाणी सोहळा प्रमुखांनी सांगितलेल्या सूचनांचे दिंडी प्रमुखांकडून तंतोतंत पालन करून मार्गक्रमण करतात.
पंढरीची वारी म्हणजे स्वयंशिस्त. कुठलंही निमंत्रण न देता आषाढाचे ढग आकाशात येतात, त्याबरोबर वारकरीही संतांच्या गावी दाखल होतात. पाऊस-शेती आणि वारीचे वेळापत्रक वारकऱ्यांनी शेकडो वर्षे सांभाळले आहे. शेतीची कामे आटोपून वर्षातील चारही पंढरीच्या वाऱ्या वारकरी करतात. म्हणजेच, पंढरीची वारी ही निसर्गचक्राशी बांधलेली आहे. वारकरी हा शेतकरीच असतो. तो शेत एका ओळीत नांगरतो. त्याच शिस्तीने बियाणे पेरतो. त्यामुळे पिके उगवलेली शेते प्रमाणबद्ध दिसतात. ही शिस्त शेतीतील प्रत्येक कामात असते. त्यामुळे वारीच्या वेळा पाळणारे, रांग न मोडता स्वयंशिस्तीने चालणारे वारकरी आपल्यालाही शिकवण देतात. ही शिस्त नैसर्गिकरित्या त्यांच्या अंगातच भिनलेली असते. शिवाय “भूतदया गाईपशूचें पालन। तान्हेल्या जीवन वनामाजी।।’ अशी सर्व जीवांप्रती वारकऱ्याच्या मनात करुणा असल्याने त्याच्याकडून आगळीक होणे शक्यच नाही.
– डॉ. श्रीरंग गायकवाड,संत साहित्य अभ्यासक