Stock Market: अमेरिका -इराण युद्ध 28 फेब्रुवारीपासून सुरू झाले. या कालावधीत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 11.48 टक्क्यांनी म्हणजे 9,339 अंकांनी कोसळला. यामुळे भारतीय शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे बाजार मूल्य या एक महिन्याच्या कालावधीत 51.09 लाख कोटी रुपयांनी कमी होऊन 412 लाख कोटी रुपये म्हणजे 4.36 लाख कोटी डॉलर इतके झाले आहे. याच कालावधीत खनिज तेल महाग झाल्यामुळे आणि व्यापार युद्धामुळे भारतीय रुपयाचे अतोनात नुकसान झाले. अशा परिस्थितीत परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी या कालावधीत मोठी गुंतवणूक काढून घेतल्यामुळे निर्देशांकावर एकाच महिन्यात एवढा मोठा परिणाम झाला आहे. भारताची स्थूल अर्थव्यवस्था अजूनही बळकट असूनही केवळ परदेशातील कारणामुळे भारतीय गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागला. हेही वाचा – India’s diesel exports rise: जगात इंधन टंचाई, पण भारताची ‘डिझेल कमाई’ जोरात! 7 वर्षांचा विक्रम गाठला आता युद्धाचा भारताच्या स्थूल अर्थव्यवस्थेवरही परिणाम होणार असल्यामुळे आगामी काही काळ भारताच्या विकासदरावर आणि शेअर बाजार निर्देशांकावर याचा परिणाम चालू राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या कालावधीत खनिज तेलाच्या किमती 72 डॉलरवरून 117 डॉलरवर गेल्या. यामुळे या कालावधीत परदेशी गुंतवणूकदारांनी एक लाख कोटी रुपये काढून घेतले.