निर्मला सितारामन यांना रिझर्व्ह बॅंकेचे आश्वासन
नवी दिल्ली : येस बॅंकेच्या कोणत्याही ठेवीदाराचे काहीही नुकसान होणार नाही, असे आश्वासन रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर यांनी दिले आहे. येस बॅंकेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आरबीआयचे नियामक काम करत आहेत. ठेवीदार, बॅंक आणि अर्थव्यवस्थेच्या हितासाठी पावली उचलली आहेत, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी आश्वस्त केले.
रिझर्व्ह बॅंक आणि सरकार येस बॅंकेच्या प्रश्नात लक्ष घालत आहेत. सर्वांच्या हिताचा मार्ग शोधत आहोत. आरबीआयच्या गव्हर्नर यांनी येस बॅंकेच्या ठेविदारांचे कोणतेही नुकसान होणार नाही, असे आश्वासन दिले आहे.
भांडवल तुटवड्यामुळे अडचणीत आलेल्या येस बॅंकेचे संचालक मंडळ रिझर्व्ह बॅंकेने बरखास्त केले आहे. येस बॅंक भांडवल उभारणीसाठी गेल्या सहा महिन्यांपासून झगडत होती. पुढील महिन्यापासून बॅंकेचे नेतृत्व स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी आणि रिझर्व्ह बॅंकेने नियुक्त केलेले प्रशासक प्रशांत कुमार यांच्याकडे असेल. देशातील सर्वात मोठी बॅंक असणाऱ्या स्टेट बॅंकेने येस बॅंकेत गुंतवणूक करण्यास तत्वत: मान्यता दिली. सीतारामन यांनी येस बॅंकेच्या ठेवीदारांना 50 हजार रुपये तातडीने काढता येतील, यावर भर दिला.