संगमनेर – वंजारी समाजाला मिळत असलेले दोन टक्के आरक्षण वाढवून सात टक्के करावे, वंजारी जातीची जनगणना करून ती प्रसिद्ध करावी, उद्योग व्यवसायांसाठी बिनव्याजी कर्ज देण्यात यावे, या व अशा विविध मागण्यांसाठी संगमनेर तालुक्यातील वंजारी समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने आज प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी वंजारी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळी अकरा वाजता मोर्चाची सुरवात जाणता राजा मैदानातून झाली. बाजारपेठेतून नवीननगर रस्त्यावरील प्रांताधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. कार्यकर्त्यांना वाढीव आरक्षण मोर्चा असे लिहिलेल्या टोप्या देण्यात आल्या. वंजारी समाजाला आरक्षण मिळणे, ही काळाची गरज आहे. 12 डिसेंबर रोजी राज्यातील तमाम समाजबांधवांनी तहसील कार्यालयात जाऊन निवेदन द्यावे व आंदोलन बळकट करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी प्रियंका बडे, सुनीता बोडखे, वनिता नागरगोजे, नीता दराडे, विशाल कानकाटे आदी विद्यार्थिनींची भाषणे झाली. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी बी. आर. चकोर, ऍड. ज्ञानेश्वर सांगळे, प्रा. गोरक्षनाथ सानप, संजय फड, तालुकाध्यक्ष तुषार वनवे, शहराध्यक्ष तुकाराम सांगळे, सुभाष सांगळे, रोहिदास सानप, रामनाथ फड, शेखर सोसे, भगवानराव इलग, नवनाथ आंधळे आदींसह युवक, युवती, विद्यार्थी व महिला उपस्थित होत्या.