नारायणगाव -शहरात करोनाचा फैलाव झपाट्याने होत असून आतापर्यंत रुग्णांच्या संख्येने शतक (100) गाठले आहे. त्यातच शनिवारी (दि. 22) दिवसभरात 21 रुग्ण सापडले आहेत. तर गेल्या दोन दिवसांपासून श्री गणेश स्थापनेसाठी नागरिक गर्दी असताना मास्क न लावता सर्रास फिरत असल्याने करोनाला निमंत्रण देत आहेत. त्यामुळे सरपंच योगेश पाटे यांनी गर्दीच्या ठिकाणी गांधीगिरी करीत मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना थांबवून त्यांना मास्क देत आरोग्याची काळजी घ्या, अशी हात जोडून विनंती केली.
सरपंच पाटे सकाळी नऊ वाजल्यापासून पूर्व वेशीच्या प्रवेशद्वारावर सहकारी आरिफ आतार, ईश्वर पाटे, अनिल खैरे, योगेश गांधी, निलेश जाधव, अझर शेख, राजेश कर्पे यांच्या समवेत गावात येणाऱ्या नागरिकांमध्ये मास्क चा वापर करण्याचे आवाहन करीत सुमारे 500 पेक्षा जास्त नागरिकांना मास्क वाटप केले. शहरात विनामास्क फिरणाऱ्या लोकांना थांबवून त्यांच्या तोंडाला मास्क बांधले आणि आरोग्याची काळजी घ्यावी, असा संदेश हात जोडून दिला.
काही नागरिक गावात विनाकारण फिरताना विशेषकरून बिना मास्क लावून फिरत आहेत. असे नागरिक स्वतः बरोबर व समाजाचा धोक्यात घालीत आहेत. तर दुकानांमध्ये गर्दी करीत असून सोशल डिस्टसिंगचे पालन करीत नाहीत. अनेकजण मास्कचा वापर न करता बिनधास्तपणे फिरत आहेत. गरज नसताना टाइमपास म्हणून फिरणाऱ्यांना आवर कसा घालावा असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.