वाई – येथील रामडोह आळीतील कृष्णाबाई संस्थानच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी करोनाच्या काळात तब्बल 66 दिवस अथक परिश्रमांतून वाई पोलिसांना दुपारचे जेवण मोफत पुरविले. या उपक्रमांत रोज पदार्थ तयार करनू देत माहिलांनीही मोठा वाटा उचलला.
आपल्याकडे गेल्या 75 दिवसांहून अधिक काळ लॉकडाऊनची परिस्थिती आहे. शासनाने संचारबंदी जाहीर केल्याने पोलीस यंत्रणेवर मोठा ताण होता. पोलिसांना रात्रंदिवस रस्त्यावर उभे राहून स्वतःचा जीव धोक्यात घालून नियंत्रण ठेवावे लागत होते. दिवसाचे वेळी तळपत्या उन्हामध्ये अनेक पोलीस रस्त्यावर उभे राहिलेले दिसून आले. पोलिसांना 12 तासांहून अधिक काळ सेवा बजवावी लागत असल्याने त्यांच्या जेवणाची हेळसांड होत होती.
पोलिसांची भोजनाची नेमकी गरज ओळखून रामडोह आळीतील कृष्णाबाई संस्थानचे प्रमुख कार्यकर्ते अनिल शेंडे, माधव तावरे, मिलिंद पुरोहित, रोहित चंद्रस, योगेश देशपांडे, घनश्याम शेंडे, जितेंद्र पाठक व अन्य प्रमुख कार्यकर्त्यांनी सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी उशिरापर्यंत शहर व परिसरांतील 38 ते 40 पोलिसांना दुपारच्या जेवणाची मोफत सुविधा पुरविली.
हे कार्यकर्ते सकाळी एकत्र जमून रामडोह आळी व गंगापुरीतून सौ. पटवर्धन यांच्याकडून पोळ्या गोळा करीत असत. त्यानंतर अनिल शेंडे यांच्या घरी महिला कार्यकर्त्या सौ. नीला शेंडे, सौ. मधुवंती पुरोहित, सौ. विशाखा तावरे, सौ. रश्मी शेवडे, श्रीमती ज्योती कानडे भाजी, चटणी- कोशिंबीर तयार करीत असत. पोळ्या व भाजी, चटणी कोशिंबीर पॅक करून जेवणाच्या पिशव्यांचे बॉक्स पोलीस कर्मचाऱ्यांकडे देत असत. नंतर ते पोलीस कर्मचारी ड्यूटीवर असणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांपर्यंत हे जेवण दुपारच्या वेळी पोहच करण्यात येत असे.
रामडोह आळीतील कार्यकर्त्यांनी हाती घेतलेल्या या उपक्रमामुळे पोलीसांच्या कुटुंबीयांना डबा पोहचविण्याची काळजी नव्हती. विशेषतः महिला पोलिसांची चांगली सोय झाली. त्यातच पोलिसांना जिल्ह्यामध्ये कोठेही ड्यूटी लावण्यात आल्याने घरांपासून दूर असलेल्या पोलिसांची जेवणाची उत्तम सोय झाली. या उपक्रमासाठी कार्यकर्त्यांनी पदरमोड करून तसेच वाईतील दानशूर व्यक्ती दि वाई अर्बन बॅंकेचे अध्यक्ष सीए. चंद्रकांत काळे, संचालक प्रा. विष्णू खरे, गिरीश देशपांडे, सीईओ श्रीपाद कुलकर्णी, निवृत्त अधिकारी विजयकुमार मुळीक, अधिकारी सुहास पानसे, रिझर्व्ह बॅंकेतील निवृत्त अधिकारी अविनाश जोशी, मामा वनारसे, हर्षद पटवर्धन, तानाजी काळे, तानाजी गाढवे, अशोक लोखंडे, माधव चौंडे, योगेश चंद्रस, चंद्रकांत कुलकर्णी, अच्योतानी बंधू, विजय लुकतुके, डॉ. विजय तावरे, श्री. दारूवाले आदींनी यासाठी आपापल्या परिने या उपक्रमास वस्तुरूपाने व आर्थिक मदत केली. 66 दिवसांपैकी एक दिवस भाजी व एक दिवस पुलाव आळीतील सौ. महाडिक व सौ. भारती निकम यांनी स्वखर्चाने करून दिला.