Wagholi : वाघेश्वर मंदिर परिसरात कचऱ्याच्या दुर्गंधीतच अंत्यसंस्कार; देवस्थान संचालक मंडळाकडून कारवाईची मागणी
Wagholi : वाघोली येथील वाघेश्वर मंदिर परिसरात टाकण्यात आलेला सुका-ओला कचरा तीन दिवसांपर्यंत न उचलल्याने मयताच्या नातेवाईकांना दुर्गंधीयुक्त वातावरणात अंत्यसंस्कार करावे लागल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

Wagholi : वाघोली येथील वाघेश्वर मंदिर परिसरात टाकण्यात आलेला सुका-ओला कचरा तीन दिवसांपर्यंत न उचलल्याने मयताच्या नातेवाईकांना दुर्गंधीयुक्त वातावरणात अंत्यसंस्कार करावे लागल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे नागरिकांसह भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून संबंधित कचरा ठेकेदाराविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
शनिवारी (दि. १३ जून) मंदिर परिसरात दोन कंटेनर सुका व ओला कचरा टाकण्यात आला होता. मात्र, तीन दिवस उलटूनही ठेकेदाराकडून तो उचलण्यात आला नव्हता. परिणामी, अंत्यसंस्कारासाठी आलेल्या मयताच्या नातेवाईकांना दुर्गंधीयुक्त कचऱ्याशेजारीच उभे राहून अंत्यविधी पार पाडावा लागला.
घटनेची माहिती मिळताच वाघेश्वरी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र सातव पाटील यांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच कचऱ्याचे चित्रीकरण करून अधिकाऱ्यांकडे पाठविल्यानंतर काही मिनिटांतच संबंधित ठेकेदाराने कचरा उचलला.
राजेंद्र सातव पाटील यांनी सांगितले की, याच ठेकेदाराच्या कामकाजाबाबत दोन वर्षांपूर्वीही महापालिकेकडे तक्रार करण्यात आली होती. त्यावेळी संबंधित ठेकेदाराची बदली करण्यात आली होती. मात्र, पुन्हा एकदा त्याच ठेकेदाराकडे काम सोपविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
मंदिर परिसरातील स्वच्छतेकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण असून अशा प्रकारांमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असल्याची चिंताही प्रतिष्ठानने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर देवस्थानच्या आगामी संचालक मंडळाच्या बैठकीत या विषयावर चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे सातव पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, संबंधित ठेकेदार सुरेश उबाळे यांनी आरोपांवर स्पष्टीकरण देताना, “मी जनगणनेच्या कामात व्यस्त असल्याने कचरा उचलण्यास थोडा विलंब झाला. माहिती मिळताच कचरा तातडीने हटविण्यात आला असून यापुढे वाघेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता राखण्याची पूर्ण काळजी घेतली जाईल,” असे सांगितले.
कचऱ्यासमोरच अंत्यसंस्कार; संतापाची लाट
दुर्गंधीयुक्त कचऱ्यासमोरच अंत्यसंस्कार करावे लागल्याने मयताच्या नातेवाईकांसह नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. वाघेश्वरी विकास प्रतिष्ठानने या घटनेचे चित्रीकरण करून संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवल्यानंतर काही मिनिटांतच कचरा हटविण्यात आला. प्रतिष्ठानच्या म्हणण्यानुसार, मंदिर परिसरातील साफसफाईसाठी पूर्वी पाच महिला कर्मचारी कार्यरत होत्या. मात्र, सध्या केवळ तीन महिला काम करत असून त्या देखील काही तासांनंतर इतर ठिकाणी साफसफाईसाठी जात असल्याने परिसराच्या स्वच्छतेवर परिणाम होत आहे.
“संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कचरा हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापुढे मंदिर परिसरात अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.” – आशा राऊत (उपायुक्त, पुणे महापालिका)
“कोणताही पूर्वग्रह न ठेवता संबंधित ठेकेदाराने जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. वाघोलीसह पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाघेश्वर मंदिर परिसरात कचऱ्याचे ढीग असणे अत्यंत अशोभनीय आहे. भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाल्यास कचरा महापालिका कार्यालयासमोर टाकण्याचा इशारा देण्यात येईल.” – राजेंद्र सातव पाटील (अध्यक्ष, वाघेश्वर विकास प्रतिष्ठान)





