Wagholi – वाघोली तालुका हवेली येथील कमल बाग गृहरचना सोसायटीमध्ये भामा आसखेड प्रकल्पांतर्गत पाण्याच्या लाईनचे काम मोठ्या दिमाखात सुरू करण्यात आले होते. मात्र अचानक एका फोनमुळे काम बंद करून संबंधित पुणे महानगरपालिकेचे अधिकारी व ठेकेदार निघून गेल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. कमल बाग सोसायटीचे चेअरमन संतोष देशमुख यांनी याबाबत सांगितले की, पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी व अधिकारी यांनी भामा आसखेड प्रकल्पाचे पाणी सोसायटीला देणार असल्याचे सांगितले याबाबत त्यांनी स्थळ पाणी करून पाण्याची लाईन कोणत्या-कोणत्या भागातून जाणार आहे. याबाबतचा नकाशा देखील सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना दाखवला त्यानुसार दिनांक 12 रोजी सकाळी नऊच्या सुमारास संबंधित ठेकेदाराच्या उपस्थित कामाच्या शुभारंभाचा नारळ फोडून कामाला सुरुवात देखील केली. मात्र अधिकारी व ठेकेदार यांना अचानक एक फोन आला या फोनवरून सोसायटीमध्ये चालू असलेले काम बंद करून संबंधित ठेकेदार व मनपाचे कर्मचारी व अधिकारी जेसीबी व पाण्याचे लाईन साठी आणलेले पाईप सोबत घेऊन गेले. कामाचे उद्घाटन करून करून काम बंद केल्याबाबत विचारणा केली असता टोलवाटोलवीची उत्तरे संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी दिली आहे. याबाबत कामाचे ठेकेदार परशुराम परमार यांना याबाबत विचारणा केली असता काम अधिकाऱ्यांनी सुरू करण्यास सांगितले होते त्याप्रमाणे काम सुरू केले होते. परंतु नंतर काम बंद करण्यात आले आहे याबाबत पुणे महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी सांगू शकतील. पाण्याच्या लाईन वरून वाघोलीत राजकारण झाले का असा संशय सध्या व्यक्त होत असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काम बंद करण्यास कोणी सांगितले? कोणाचा फोन आला होता अशी मात्र चर्चा मोठ्या प्रमाणात रंगू लागली आहे.