राजगुरूनगर – यंदा कर्तव्याचे 63 मुहुर्त 9 जुलैपर्यंत होणार लगीनघाई दरवर्षी तुळशी विवाह होताच लगीनघाईला सुरवात होते. यंदा 20 नोव्हेंबरपासून मुहुर्ताचा सुरू होणारा सिलसिला जुलै 2022 पर्यंत चालणार आहे.
म्हणजेच 9 महिन्याच्या काळात 63 लग्नतिथी लग्न सोहळ्याकरिता मिळणार आहेत. लग्नाचा बार उडवण्यासाठी अनेक वधू व वरपक्ष सज्ज झाले असून नातेवाईकांकडून सोयरीक जुळवण्यावर भर दिला जात आहे.
दरवर्षी तुळशीविवाहनंतर विवाह समारभाला धूमधडक्यात सुरवात होते. मात्र, दोनवर्षापासून करोनामुळे नियमांच्या कचाट्यात समारंभ होत असून यंदा शिथिलता असणार आहे.
यंदा कर्तव्य असलेल्यांना मुहुर्तानुसार नोव्हेंबर महिन्यापासून लग्नाचा हंगाम सुरू होणार आहे. नोव्हेंबरमध्ये ज्यांनी विवाह निश्चित केले आहेत.
त्यांच्याकडे पत्रिका छपाई बाजंत्री मंडप आचारी बस्त्याची तयारी सुरू आहे. यंदा 20 नोव्हेंबर पासून लग्न सराईचा धूमधडाका सुरू होत असून नोव्हेंबर 2021 ते 1 जुलै 2022 पर्यंत 63 लग्नतिथी आहेत.
नोव्हेंबर व मार्चमध्ये सर्वात कमी 4 तर सर्वाधिक मुहुर्त डिसेंबर महिन्यात 11 मुहुर्त आहेत. वेगवेगळ्या पंचांगनुसार हे मुहूर्त कमी अधिक होत असल्याने अनेकजण आतापासूनच तयारीला लागले असल्याचे चित्र आहे.
अशा आहेत तिथी
– नोव्हेंबर मुहूर्त 20, 21, 29, 30
– डिसेंबर 1, 7, 8, 9, 13, 19, 24, 26, 27, 28, 29, 26, 28, 31
– जानेवारी 20, 22, 23, 27, 29
– फेबुरवारी 5, 6, 7, 10, 17, 19
– मार्च 25, 26, 27, 28
– एप्रिल 15, 17, 19, 21, 24, 25
– मे 4, 10, 13, 14, 18, 20, 21, 22, 25, 26, 27
– जून 1, 6, 8, 11, 13, 14, 15, 16, 18, 22
– जुलै 3, 5, 6, 7, 8, 9,
करोनाच्या संसर्गमुळे दोन वर्षांपासून बॅंडचे व्यवसाय पूर्णपणे ठप्प असल्याने कारागिरावर उपासमारीची वेळ आली आहे. लाखो रुपये गुंतवणूक करून हाती काहीच आले नाही. यावर्षी चांगले दिवस येतील अशी अशा आहे.
– पोपट सरोदे, बॅंड व्यावसायिक