नवी दिल्ली – बांगलादेशमध्ये एका हिंदू व्यक्तीच्या झालेल्या हत्येवर भारताने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांना लक्ष्य करणाऱ्या घटनांची मालिका चिंताजनक असल्याचे भारताने म्हटले आहे आणि अशा हिंसाचाराकडे दुर्लक्ष करता येणार नाही असा इशारा दिला आहे. शुक्रवारी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, सीमापार घडलेल्या घटनांची भारताने गंभीर दखल घेतली आहे. या हल्ल्यांकडे दुर्लक्ष केले जाणार नाही, आणि या घटनांसाठी जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा केली जाईल अशी आम्ही आशा करतो. बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांचा सतत केला जाणारा द्वेष हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. बांगलादेशमध्ये बुधवारी आणखी एका हिंदू व्यक्तीची जमावाकडून हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे अलिकडच्या आठवड्यात अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांशी संबंधित हिंसक घटनांच्या वाढत्या यादीत भर पडली आहे. बांगलादेशातील स्थानिक वृत्तांनुसार, ही हत्येची दुसरी घटना बुधवारी ढाक्यापासून सुमारे १४५ किलोमीटर पश्चिमेला असलेल्या राजबारी शहरातील पांगशा उपजिल्ह्यात घडली. पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीत एका बांगलादेशी माध्यमाने मरण पावलेल्या हिंदू व्यक्तीचे नाव अमृत मंडल असल्याचे म्हटले आहे. खंडणी मागण्याच्या आरोपावरून त्याची स्थानिकांनी मारहाण करून हत्या केल्याचा दावा करण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की बांगलादेशातील विद्यमान सरकारच्या काळात अल्पसंख्याकांवर हिंसाचार, जाळपोळ आणि इतर अत्याचारांच्या २,९०० घटना घडल्या आहेत. बांगलादेशमध्ये भारताविरुद्ध पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्यांचा आम्ही वारंवार इन्कार केला आहे. सध्याचे बांगलादेश सरकार तेथील सुरू असलेल्या हिंसाचार आणि बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेसाठी जबाबदार आहे. आम्ही अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत सतर्क आहोत आणि त्यावर बारकाईने लक्ष ठेवत आहोत. बांगलादेशातील हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध आणि शीखांची सुरक्षा ही चिंतेची बाब आहे.