इम्फाळ – मणिपूरमध्ये पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. सार्वजनिक वाहतुकीवरील निर्बंध उठवण्याच्या केंद्राच्या निर्देशाचा निषेध करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलांना बळाचा वापर करावा लागला. पोलिसांनी इंफाळ व्हॅली आणि कांगपोक्पी जिल्ह्याच्या सीमेवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून निदर्शक जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकारने निर्देश दिले होते की मेईतेई आणि कुकी समुदायांमधील संघर्षामुळे गेल्या २२ महिन्यांपासून बंद असलेले सर्व रस्ते शनिवारी जनतेसाठी खुले करावेत. पण या गोष्टीचा उलटाच परिणाम दिसून आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सूचनेनंतर अधिकाऱ्यांनी राज्यातील सर्व बंद रस्ते खुले केले. परंतु अनेक लोक सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधांबद्दल खूश नाहीत. ते याला विरोध करत आहे. त्यामुळे पुन्हा तणाव वाढला आहे. कांगपोक्पीमध्ये महिला गटांनी इम्फाळहून येणाऱ्या मणिपूर राज्य परिवहन बसला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सुरक्षा दलांना निदर्शकांना पांगवण्यासाठी बळाचा वापर करावा लागला. यापूर्वी, मणिपूरचे राज्यपाल ए. के. भल्ला यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाने केंद्राच्या सूचनांचे पालन केले आणि बंद केलेले रस्ते उघडले. त्यासाठी सरकारने सार्वजनिक बसेसची व्यवस्था केली होती. गृहमंत्री अमित शहा यांनी म्यानमारच्या सीमेवरील नियुक्त प्रवेश बिंदूंच्या दोन्ही बाजूंना कुंपण घालण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले जेणेकरून परिस्थिती सामान्य होईल. वांशिक संघर्षानंतर अनेक रस्ते बंद मे २०२३ मध्ये कुकी आणि मेईतेई समुदायामध्ये वांशिक संघर्ष सुरू झाला होता. यामध्ये २५० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. मेईतेई समुदायातील लोकांनी कुकीबहुल टेकड्यांमधील आपली घरे सोडून दिली होती. त्याच वेळी, कुकी समुदायाच्या लोकांनीही मेइतेई भागातील आपली घरे सोडली. परिस्थिती इतकी बिकट झाली की दोन्ही समुदायांच्या सदस्यांनी एकमेकांचा जास्त प्रभाव असलेल्या भागात जाणे बंद केले. पुन्हा तणाव वाढला तथापि, महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू करण्याच्या सूचनांदरम्यान शनिवारी प्रस्तावित शांतता मोर्चामुळे पुन्हा एकदा तणाव वाढला. खोऱ्यातील सुमारे २० संघटनांचा समूह असलेल्या फेडरेशन ऑफ सिव्हिल सोसायटीजच्या नियोजित मोर्चापूर्वी मेइतेई-बहुल इम्फाळ आणि कुकी आदिवासी टेकड्यांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली होती. एफओसीएसचे प्रमुख टीएच मनिहार म्हणाले, आम्ही खोरे आणि टेकड्या एकत्र करण्यासाठी इंफाळ ते सेनापतीपर्यंत ही शांतता रॅली काढत आहोत. आम्ही तिथे जाऊन त्यांच्याशी बसून चर्चा करू. आम्ही आमच्या कुकी आणि नागा लोकांमध्ये कोणतेही शत्रुत्व ठेवणार नाही, आम्ही सर्व मणिपूरचे रहिवासी आहोत. अमित शहा यांचे आवाहन नाकारले दरम्यान, कुकी संघटनांनी प्रस्तावित मोर्चाला धोकादायक चिथावणी म्हटले. त्यांनी एफओसीएस सदस्यांना डोंगराळ भागात प्रवेश करू नये असा इशारा दिला. आदिवासी एकता समितीने अमित शहा यांचे मुक्त संचाराचे आवाहन देखील नाकारले. समितीने म्हटले आहे की मोर्चाचे आयोजन करणे हे बफर झोनचे स्पष्ट उल्लंघन असेल. आयटीएलएफच्या प्रवक्त्या गिन्झा वुआलझोंग म्हणाल्या, आम्ही वस्तूंच्या वाहतुकीचे स्वागत करतो पण सुरक्षेच्या कारणास्तव लोकांच्या हालचालीचे स्वागत करत नाही. लोक अजूनही खूप संतप्त आहेत. कुकी समुदायाच्या वेगळ्या प्रशासनाच्या मागणीवर कोणतीही चर्चा झालेली नाही.