पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट गावांमधून निवडून आलेले नगरसेवक केवळ नावाला नगरसेवक आहेत. यातील एकाही नगरसेवकाला अधिकार नाहीत. त्यांना दाबून ठेवण्यात आले आहे. या मतदारसंघाचा रिंगमास्टर त्यांना मर्जीने काम करू देत नाही. मतदारसंघातील मोकळ्या जागा बळकावल्या जात आहेत.
मतदारसंघात बळावलेली ही हुकूमशाही प्रवृत्ती ठेचायची असेल, तर अपक्ष उमेदवार विलास लांडे यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही, त्यामुळे विलास लांडे यांना विजयी करून मतदारांनी आपले भविष्य सुरक्षित करावे, असे आवाहन माजी सरपंच गणपत आहेर यांनी केले.
भोसरी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे यांच्या प्रचारासाठी चिखलीतील जाधववाडी व कुदळवाडी परिसरात काढलेल्या पदयात्रेत ते बोलत होते. लांडे यांनी या भागातील नागरिक व व्यापाऱ्यांची भेट घेऊन संवाद साधला. कोपरा बैठका घेऊ कपबशीलाच मतदान करण्याचे आवाहन केले. मोकळी जागा दिसली की ताबा मारणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी विजयी करा, असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले. यावेळी माजी सरपंच गणपत आहेर, मुरलीधर ठाकूर, नितीन सस्ते, गुलाब बालघरे, माऊली मोरे, रोहिदास बालघरे, सिद्धा रोकडे, काळूराम मोरे, चिमणराव बालघरे, माऊली मोरे, गणेश यादव, बाळासाहेब मोरे, नाना बालघरे, सागर यादव, अच्युतराव गंतले, सुंदर रोकडे, लतीफ शेख, ज्ञानोबा मोरे, रमेश मोरे आदी उपस्थित होते.
आहेर पुढे म्हणाले, विलास लांडे हे भोसरी मतदारसंघाचे दहा वर्षे आमदार असताना नागरिकांना पूर्ण स्वातंत्र्य होते. प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याची मुभा होती. मात्र गेल्या पाच वर्षांत या मतदारसंघात दहशतीचे वातावरण पसरले आहे. कोणाला काही करू दिले जात नाही. कामगारांपासून ते उद्योजकांपर्यंत सर्वांना दमदाटी केली जाते. सर्वांना दहशतीखाली ठेऊन सोशल मीडियावर मात्र विकासकामांचा डांगोरा पिटला जात आहे. कामे केली नाहीत म्हणूनच तर हा असा ढोल बडवला जात आहे.
तरूणांना रोजगार देण्याऐवजी हफ्ते वसुलीसाठी त्यांना एक प्रकारे प्रोत्साहनच दिले जात आहे. मतदारसंघातील तरूणांचे भविष्य आता सुरक्षित राहिलेले नाही. आता जे काही सुरू आहे, ते सर्व भयानकच आहे. हे चित्र नागरिकांनीच आता बदलले पाहिजे. विलास लांडे हेच या मतदारसंघाचा विकास करू शकतात. त्यामुळे मतदार विलास लांडे यांनाच भरघोस मतांनी निवडून देतील, असा विश्वास गणपत आहेर यांनी व्यक्त केला.
दरम्यान, अपक्ष उमेदवार विलास लांडे यांनी कुदळवाडीगावचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात दर्शन घेऊन सकाळी 9 वाजता पदयात्रेला सुरूवात केली. पुढे बालघरे वस्तीमार्गे जाऊन विठ्ठल मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर यादवनगर, पवारवस्ती, हरगुडेवस्ती, सेक्टर क्रमांक 16, पंतनगर, जाधववाडी संत सावता माळी मंदिरात दर्शन, सरपंचवस्ती, सहयोगनगर, अहिरवाडी चौक, सुभाष जाधव चौक वडाचा मळा या भागात घरोघरी जाऊन नागरिकांशी
संवाद साधला.