मुंबई : पंतप्रधान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. देशाचे पंतप्रधान हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात नवी मुंबई विमानतळ, मेट्रो प्रकल्प असे विविध प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे. नवी मुंबई विमानतळाचे काम अपूर्ण आहे. डिसेंबरपासून या विमानतळावरून उड्डाण होणार आहेत अशा वेळी अपूर्ण राहिलेल्या कामाचे उद्घाटन हे फक्त श्रेय घेण्यासाठी सुरू आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन सोहळे पार पाडले जात आहेत. राज्यातील बळीराजाचा विसर केंद्र सरकारला पडता कामा नये. पंतप्रधान मोदी यांनी मदत जाहीर करून अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे. पंतप्रधान महाराष्ट्रात येत असताना शेतकऱ्यांना देखील भरभरून दिले पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. दरम्यान, १० ऑक्टोबर रोजी नागपूर इथे ओबीसी आरक्षणासाठी महामोर्चा होणार आहे. हा मोर्चा सकल ओबीसी संघटनांचा आहे या मोर्चात जे कोणी सहभागी होतील त्यांचे स्वागत करू, असे काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार म्हणाले आहेत.