Tamilnadu Result: एका मताची किंमत काय असते, याची प्रचिती पुन्हा एकदा भारतीय राजकारणात आली आहे. तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांच्या मंत्रिमंडळातील दिग्गज नेते पेरियकरुप्पन यांचा अवघ्या १ मताने पराभव झाला आहे. चित्रपट स्टार ‘थलापती’ विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कझगम’ (TVK) पक्षाचे उमेदवार सीनिवासा सेतुपती यांनी हा चमत्कार करून दाखवला. शेवटच्या फेरीपर्यंत थरार: पेरियकरुप्पन यांचा पराभव – तिरुप्पत्तूर मतदारसंघात झालेली ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. सलग चार वेळा आमदार राहिलेले पेरियकरुप्पन पहिल्या फेरीपासून २५ व्या फेरीपर्यंत आघाडीवर होते. मात्र, २६ व्या फेरीनंतर चित्र पालटले. ३० व्या आणि शेवटच्या फेरीपर्यंत हा सामना रंगला आणि अखेर सीनिवासा सेतुपती यांनी १ मताने विजय मिळवत विधानसभेचे तिकीट निश्चित केले. सेतुपती यांच्या विजयाने थलापती विजय यांच्या राजकीय प्रवासाची धमाकेदार सुरुवात झाली आहे. जेव्हा १ मताने हुकले मुख्यमंत्रीपद: सी.पी. जोशींची ऐतिहासिक हार – एका मताने निवडणूक हरणाऱ्या नेत्यांच्या यादीत राजस्थानचे दिग्गज नेते सी.पी. जोशी यांचे नाव सर्वात वर येते. २००८ च्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत जोशी हे काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, नाथद्वारा मतदारसंघातून भाजपच्या कल्याण सिंह चौहान यांनी त्यांना अवघ्या १ मताने धूळ चारली. परिणामी सी.पी. जोशींच्या या पराभवामुळे अशोक गेहलोत यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला. चूक काय झाली? विशेष म्हणजे, सी.पी. जोशींच्या पत्नी, आई आणि चालक यांनी मतदान केले नव्हते. जर यांपैकी एकानेही मतदान केले असते, तर राजस्थानचा इतिहास वेगळा असता. कर्नाटकचा तो धक्कादायक निकाल (२००४)- एका मताने पराभूत होणारे पहिले नेते होण्याचा नकोसा विक्रम कर्नाटकमध्ये नोंदवला गेला होता. २००४ मध्ये काँग्रेसच्या रंगास्वामी ध्रुवनारायण यांनी जेडीएसचे विद्यमान आमदार ए.आर. कृष्णमूर्ती यांचा १ मताने पराभव केला होता. कृष्णमूर्ती यांनी निवडणुकीच्या कामात वेळ वाचवण्यासाठी आपल्या चालकाला मतदान करण्यापासून रोखले होते, जे त्यांच्या अंगाशी आले. एका मताने पडले होते देशाचे सरकार! – केवळ आमदारकीच नाही, तर एका मताने देशाचे पंतप्रधान पदही गेले आहे. १९९९ मध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार अवघ्या १ मताने कोसळले होते. जयललिता यांनी पाठिंबा काढून घेतल्यावर लोकसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला होता. सरकारच्या बाजूने २६९ मते, तर विरोधात २७० मते पडली होती. वाजपेयींचे ते भाषण आजही भारतीय लोकशाहीतील एक महत्त्वाचा दस्तऐवज मानले जाते. दरम्यान, निवडणुकीत प्रत्येक मत महत्त्वाचे असते. मग तो राज्याचा मुख्यमंत्री असो वा देशाचा पंतप्रधान, एका मताचा फरक सत्तेचे समीकरण पूर्णपणे बदलू शकतो. तामिळनाडूच्या निकालाने पुन्हा एकदा हेच सिद्ध केले आहे.