लंडन – भारतातील बॅंकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावून ब्रिटनमध्ये परागंदा झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याला भारतात हद्दपार करण्याच्या संबंधातील आदेश तेथील सुप्रीम कोर्टानेही कायम केल्यानंतर मल्ल्याने ब्रिटनच्या गृहमंत्र्यांकडे अर्ज करून ब्रिटनमध्ये आपल्याला राजकीय आश्रय मिळावा यासाठी खटपट सुरू केल्याचे वृत्त आहे.
भारताने त्याला आपल्या हवाली करावे, अशी मागणी करणारा अर्ज तेथील न्यायालयात केला होता. सुप्रीम कोर्टाने हा अर्ज मान्य केला आहे. तथापि त्यावर ब्रिटनच्या गृहमंत्री प्रिती पटेल यांची स्वाक्षरी होणे बाकी आहे. त्यांनी काही निर्णय देण्यापूर्वीच मल्ल्याच्या वकिलाच्या वतीने त्यांच्याकडे राजाश्रयाची मागणी करणारा अर्ज करण्यात आल्याचे वृत्त आहे.
भारतात जाणे टाळण्यासाठी त्याने ही क्लृप्ती लढवली आहे. तथापि, त्याला ब्रिटन सरकारकडून किती मदत मिळणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरवले आहे. 3 फेब्रुवारीला यावर ब्रिटनच्या गृहमंत्र्यांकडून निर्णय होईल, असे सांगण्यात येते. कोर्टाच्या सर्व प्रक्रियांमध्ये विरोधात निकाल गेल्यानंतर संबंधित आरोपीला ब्रिटन सरकारकडून अशा स्वरूपाचा आश्रय मिळणे ही अशक्य कोटीतील बाब मानली जात आहे.