– माधव विद्वांस
कोकणचे पिंजारी म्हणून ओळखले जाणारे स्वातंत्र्य सैनिक, दलित मित्र भार्गव फाटक उर्फ बाबा फाटक यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 26 जानेवारी 1911 रोजी जालगाव तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी येथे झाला. त्यांचे वडील महादेव उर्फ बाळशास्त्री हे इंग्रज अधिकारी जॅक्सन याचा खून करणारे अनंत कान्हेरे यांचे मित्र होते. 1930 मध्ये प्रभातफेरी व मिठाच्या सत्याग्रहामध्ये त्यांनी भाग घेतला आणि त्यात बाबांना 2 महिने तुरुंगवास व 20 रुपये दंडाची शिक्षा झाली. 28 डिसेंबर 1931 रोजी गांधीजी इंग्लंडहून मुंबईस परतले होते. त्यानंतर झालेल्या सभेत गांधीजींचे भाषण ऐकले. त्यामुळे बाबा भारावून गेले.
वर्ष 1932 मध्ये ब्रिटिश सरकार विरोधी पत्रके वाटल्याबद्दल 1 वर्ष सक्तमजुरी व 100 रुपयांचा दंड अशी शिक्षा झाली. या तुरुंगवासात तेथे असलेल्या सेनापती बापट व आप्पासाहेब पटवर्धन यांच्यासारख्याचा अनेक थोरांचा बाबांना सहवास लाभला. त्यामुळे बाबांच्या आयुष्याला एक वेगळे वळण मिळाले. बाबा तिथे आप्पासाहेबांसोबत सफाई व मैला वाहण्याचे कार्य करीत होते. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर बाबांनी केवळ अहिंसक लढाई सोडून सशस्त्र क्रांती करायचे ठरवले.
त्यांनी पोस्टाच्या तारा तोडल्या, टपाल लुटले, पिस्तुले, तलवारी, बॉम्बचा संग्रह केला तसेच ते भूमिगत होऊन चळवळीचे काम करत असल्याने सरकारने त्यांना पकडण्यासाठी 5 हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते. त्यांना अटक झाल्यावर खटला होऊन 7 वर्षांची शिक्षा झाली. असे वारंवार खटले व तुरुंगवास यामुळे त्यांच्या घरात दैन्यावस्था आली.सरकारने मालमत्ता व घरातील भांड्या-कुंड्यांचा लिलाव करून दंडाची वसुली केली.
बाबा हे पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते होते म्हणून त्यांनी जातीभेद पाळला नाही, अंधश्रद्धा पाळल्या नाहीत. ते हरिजन वस्तीत जाऊन राहिले. त्यांना पाण्यासाठी विहीर खणली. ते पिंजारीकाम व चर्मकाम शिकले व घराचे दारावर ‘कोकणचा पिंजारी’ अशी पाटी लावली. सुतकताई, मागावर कापड विणणे या सारखे कुटिरोद्योग त्यांनी सुरू केले.आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे गांधीजींच्या ‘खेड्याकडे चला’ या संकल्पनेचा प्रसार सुरू केला. मैला वाहणे, मृत जनावरांची कातडी काढणे, कातडी कमावणे, त्यापासून चपला व चामड्याच्या वस्तू बनवणे अशी हलक्या प्रतीची मानली जाणारी कामे त्यांनी केली.
दापोलीत गोसेवा चर्मालय सुरू केले. वाई येथे पुन्हा वर्ष 1962/63चे दरम्यान ते येऊन राहिले होते. मेलेल्या जनावरांची तसेच सर्पांचीही कातडी काढीत व जनावर किंवा मेलेल्या सापाची माहिती देणार्यास 4 आणे देत असत याचा अनुभव प्रस्तुत लेखकाने घेतला आहे. 15 ऑगस्ट 1972 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते बाबांना ‘ताम्रपट व सन्मानपत्र’ मिळाले. त्यांना ‘दलितमित्र’ म्हणून गौरविण्यात आले. या थोर देशभक्त व समाजसुधारकांचे 5 सप्टेंबर 1981 रोजी निधन झाले.